जळगाव ः जिल्ह्यात आठवडाभरापासून असलेले ढगाळ हवामान आणि हलक्या सरी कोसळल्यानंतर निर्माण झालेली पावसाची शक्यता यामुळे केळी, कापूस व तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आधीच खरिपात फटका बसला, आता रब्बी जेमतेम उभा राहत असतानाच ढगाळ हवामान निर्माण झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, यावल भागांत सोमवारी सकाळी (ता. २०) हलक्या सरी कोसळल्या. तसेच धुळ्यातही शिंदखेडा, शिरपूर, धुळे भागांत हलका पाऊस झाला. पाऊस अधिक नव्हता, परंतु ढगाळ वातावरण कायम आहे. त्याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. ढगाळ वातावरणामुळे केळीवर करप्याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. केळीची पाने पिवळी पडल्याने ती नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांना श्रम घ्यावे लागत आहेत. लहान केळीच्या पिकात ही समस्या अधिक आहे. रावेर, यावल, चोपडा, भडगाव भागांतील मिळून जवळपास १९ हजार हेक्टरवरील लहान किंवा चार पाच महिन्यांच्या केळी पिकामध्ये करप्याची समस्या अधिक आहे. त्यातच केळी कापणीही रखडली आहे.
तुरीमध्ये फुलगळ सुरू असून, तयार शेंगांवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव सध्याचा प्रतिकूल हवामानामुळे वाढू लागल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच थंडी गायब झाल्याने पानांवर चिकटाची समस्याही निर्माण होऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कपाशीची बोंडे काहीशी ओली झाली. त्यात आर्द्रता वाढल्याने त्यांचा दर्जा घसरू लागला आहे. तसेच कपाशीची पाने काळी, लालसर पडू लागली आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण नसल्याने बोंडे उमलत नसल्याचे चित्र आहे. तसेच कापसावर रसशोषक किडींचाही प्रादुर्भाव होत असल्याची माहिती मिळाली.
कपाशीमध्ये आणखी आठ ते १० टक्के नुकसानीची भीती आहे. ढगाळ वातावरणामुळे मका, ज्वारीची काढणी सुरू असून, नासाडी होऊ नये म्हणून काढणीअभावी पडून असलेले कणसे झाकून ठेवण्यासाठी रोज सायंकाळी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. पण काही ठिकाणी केळीची काढणी किंवा कापणी मात्र सध्या व्यापाऱ्यांनी बंद ठेवली आहे.