सांगली : द्राक्ष हंगामाच्या तोंडावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्षबागांना याचा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे भुरी, डाउनी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम जवळ आला आहे. मणेराजुरी, सोनी, बेडग, खंडेराजुरीतील द्राक्षे पुढील पंधरा दिवसांत बाजारपेठेत येतील. त्यातच आगाप छाटण्यानंतर बहुतांशी बागा ३० ते ६० दिवसांच्या असताना महिन्यापूर्वी झालेल्या पावसाने डाउनीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बागा सोडाव्या लागल्या आहेत. त्यातच सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे; तर गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. उशिरा छाटणी केलेल्या द्राक्षबागा अडचणीत सापडल्या आहेत. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारण्या सुरू आहेत.
सध्या बागांमध्ये द्राक्षमणी तयार होत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला जातो की काय, अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त होते आहे. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये रात्रंदिवस द्राक्षबागेत फवारणी सुरू असून पंपांची घरघर वाढली आहे. शेतकरी रात्रंदिवस बागेत तळ ठोकून आहेत. गेल्या वर्षी पूर्ण हंगाम हवामान चांगले असल्याने खर्च कमी उत्पादन जास्त अशी स्थिती होती.
या वर्षी छाटण्यांपासून हवामानातील फेरबदलाने द्राक्षबागायतदार त्रस्त झालेत. बुरशीनाशकाचा एक स्प्रे घेण्यासाठी ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत खर्च वाढतो. तीन आठवड्यांत डाउनीची भीती, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने फवारण्या वाढणार आहेत.