सातारा ः शेतकऱ्यांकडील वीजबिले वसूल व्हावी, यासाठी महावितरण वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे; मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी फ्यूज बॉक्सच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.
फ्यूज बॉक्सच्या दुरवस्थामुळे अनेक कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला असतानाही महावितरण याकडे डोळेझाक करत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह महावितरण कंपनीचे वायरमन हैराण झाले आहेत. फ्यूज बॉक्सची दुरुस्ती करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच पुरेसे मनुष्यबळ त्वरित उपलब्ध करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून कृषिपंपांच्या १० हजारांवर वीज जोडण्या प्रलंबित आहेत. वीज जोडण्याची शेतकऱ्यांची लाखो रुपयांची अनामत महावितरण कंपनीकडे पडून आहे. तसेच शेतकऱ्यांकडून थकलेली वीजबिले वसूल करण्यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करून बिले घेतली जात आहेत. मात्र वीजपुरवठा अखंडित केला जात नाही.
शेतात बसविण्यात आलेल्या फ्युज बॉक्समध्ये फ्युज नसल्याने तारेचा वापर करून वीज सुरू ठेवली जात आहे. साहित्याअभावी वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतातील पाण्याचे चक्र पूर्ण करण्यासाठी रात्रं दिवस कसरत करावी लागत आहे. या संदर्भात महावितरण्याच्या वरिष्ठांकडे चौकशी केली तर निधी उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे.
फ्यूज बॉक्स बंदिस्त नसल्यामुळे ते धोकादायक झाले आहेत. अनेक फ्यूज बॉक्स जुने झालेले आहेत. आठवड्यात तीन दिवस दिवसांचे भारनियमन केले जात असल्याने रात्रीची वीज दिली जाते. रात्रीच्या वेळी कर्मचारी उपलब्ध होत नसल्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून फ्यूज घालण्याची कामे करावी लागत आहेत. तसेच वीजवाहक तारा लोंबकळत असल्याने अनेक वेळा पिकांना आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या नुकसानीचे पंचनामे होतात; मात्र भरपाई मिळत नाही.
महावितरणाच्या अनेक शाखांत निम्मेच वायरमन उपलब्ध आहेत. यामुळे उपलब्ध वायरमन दोन गावांची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यातच साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे वायरमन कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहेत. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असताना डोळेझाक करत आहेत. वांरवार वीज खंडित होण्यामुळे शेतकरी आणि वायरमन यांच्यामध्ये वारंवार वाद होत आहेत.