नदीला नवजीवन

नदीचं चित्र प्रदूषणामुळे पुरतं बिघडून गेलं होतं. नदीच्या पाण्यात पाणवनस्पतींचं रान माजलं होतं. नदीजवळून जाताना घाण वास यायचा. जवळपास चाळीस गावांचा सारा कचरा नदीत जायचा
संत बलबीर सिंह
संत बलबीर सिंह

पंजाबातील कपूरथलातल्या सिचेवाल गावातल्या काली बेई नदीला संजीवनी देण्याचं काम संत बलबीर सिंह यांनी केलं आहे. प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली ही नदी आज स्वच्छ आणि प्रवाही दिसते.

बलबीर सिंहजी महाविद्यालयात शिकत असताना त्यांचा ओढा सामाजिक कामाकडे वाढला. समाजासाठी काही चांगलं करावं असं त्यांना मनाेमन वाटायला लागलं. काय करायचं हे मात्र माहीत नव्हतं. परंतु सुरवात आपल्या गावापासूनच करावी लागेल, याची खूणगाठ त्यांनी बांधली. गावातली मंडळी आपल्या माहितीची आहेत, त्यांनाही आपल्या बरोबरीने घेता येईल, असा विचार त्यांनी केला. ते साल होतं १९९१.

गावातला रस्ता खाचखळग्याने भरलेला, खराब होता. शाळेत जाणाऱ्या मुलांचे खूप हाल होत असत. हा रस्ता नीट करण्याचं बलबीर सिंह यांनी ठरवलं. त्यासाठी गावातील पुरुष मंडळी, तरुण, महिला यांनाही सहभागी करून घेतलं आणि काम फत्ते झालं. गावात रस्ता झाल्यामुळे गावात पिकणारे गाजर, बटाटे, खरबूज बाजारात वेळेवर पाेचवणं शक्य झालं. बलबीर सिंह यांना या कामामुळे ओळख मिळाली. त्यानंतर एके दिवशी जालंधरमध्ये सभा झाली. या सभेमध्ये काली बेई या स्थानिक नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुढे आला. प्रशासनाने आपल्या परिने सर्व प्रयत्न केले होते. इतरांनाही मदतीचा हात दिला होता. परंतु प्रदूषणाची स्थिती जैसे थे हाेती.

खरं तर नदीचं मूळ नाव सफेद नदी असं होत; पण आता काली बेई हे नाव चपलख बसत हाेतं. बलबीर सिंह यांनी ही नदी स्वच्छ करण्याचं मनावर घेतलं. शिखांचे पहिले गुरू गुरुनानक यांनी काली बेई किनारी १४ वर्षे ९ महिने आणि १३ दिवस इतका मोठा काळ व्यतीत केला होता. याच ठिकाणी त्यांनी ‘एक ओंकार सतनाम’चा मंत्र दिला होता. गुरुनानकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या नदीचं चित्र प्रदूषणामुळे पुरतं बिघडून गेलं होतं. नदीच्या पाण्यात पाणवनस्पतींचं रान माजलं होतं. नदीजवळून जाताना घाण वास यायचा. जवळपास चाळीस गावांचा सारा कचरा नदीत जायचा. 

या नदीचे पावित्र्य पुन्हा आणण्याचं काम तसं सोपं नव्हतं. पण इथल्या स्थानाशी लाेकांच्या जुळलेल्या भावना महत्त्वाच्या होत्या.  एके दिवशी बलबीर सिंह यांनी आसपासच्या गावातल्या लोकांना बोलवून त्यांच्याशी नदीच्या स्वच्छतेविषयी चर्चा केली; आणि अगदी दुसऱ्याच दिवशीपासून आपल्या साथीदारांसह काम सुरू केलं. परंतु लोकांनी या कामाकडं पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, शंका घेतल्या. पण बलबीर सिंह आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यांनी काम सुरूच ठेवलं. मग हळूहळू लोकांनी हातभार लावायला सुरवात केली. संकटेही आली. मोठ्या उद्योजकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्याशीही चर्चा करून मार्ग काढण्यात आला.

बलबीर सिंह यांनी हाती घेतलेल्या कामामुळे १६० किलोमीटर लांबीची नदी पुन्हा एकदा प्रवाहित झालीच; शिवाय नदीकाठची जवळजवळ पन्नास एकर जमीन पुन्हा एकदा हिरवी झाली. नदी पुनरुज्जीवित करण्याच्या या कामाच्या सोबतीने गरिबांसाठी मोफत शाळा, शिक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांतही बलबीर सिंह यांनी काम उभे केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने २००८ मधील पर्यावरणाच्या शिलेदारांत त्यांचा समावेश केला. जागतिक पातळीवरील विविध पर्यावरणविषयक परिषदांमध्ये त्यांना मानाने बोलविण्यात येते.

भारत सरकारने त्यांना पद्मश्री बहाल केली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले. त्यावर ते विनम्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. ते म्हणतात-  ‘‘गुरू नानकजींनी सांगितलं आहे, ‘पवन गुरू, पाणी पिता, माता धरती महत। दिवस रात दोए दायी दाइआ, खेले सगल जगत।।’ मी फक्त त्याचं पालन केलं.’

- मयूरा बिजले (लेखिका पर्यावरण अभ्यासक आहेत.)   : ९८८११२९२७९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com