इथेनॉलच्या दराबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार : पवार

इथेनाॅल
इथेनाॅल

पुणे : साखर कारखान्यांकडून विकत घेतल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या दराचा आढावा घेण्याची तयारी केंद्र सरकारने दाखविली आहे. मात्र, यात विरोधाभास असून, मी लवकरच याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.

व्हीएसआयच्या मुख्यालयात श्री. पवार यांनी साखर कारखाना उद्योगातील समस्यांविषयी वार्ताहरांसमोर आपली मते व्यक्त केली. इथेनॉलचे दर साखर कारखान्यांना परवडत नसल्यामुळे दराचा आढावा घेण्याची तयारी पंतप्रधानांनी दाखविली होती. त्याला काही महिने उलटून गेले आहेत. मात्र, पेट्रोलियममंत्र्यांनी दर वाढवून देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

याबाबत श्री. पवार म्हणाले, की हा विरोधाभास आम्ही सरकारच्या लक्षात आणून देऊ. माझी याविषयी अजून पंतप्रधानांशी चर्चा झालेली नाही. त्यासाठी मी स्वतः पंतप्रधानांना पुढील ८-१० दिवसांत भेटून इथेनॉल दरातील अडचणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण, या मुद्द्यावर पंतप्रधान सकारात्मक आहेत.

देशातील साखरेच्या दराचा मुद्दा नियमित चर्चेला जातो. त्यामुळे ग्राहकांसाठी आणि खाद्यपदार्थ- व्यावसायिक बाबींसाठी साखर विक्रीचे दर स्वतंत्र असावेत काय, असा प्रश्न विचारला असता श्री. पवार म्हणाले, की साखर विक्रीसाठी दोन स्वतंत्र किमती ठेवण्याचा मुद्दा व्यवहार्य वाटत नाही. कारण, घरगुती कारणास्तव विकत घेतली जाणारी साखर पुढे कोण, कशासाठी वापरते यावर नियंत्रण नसते. त्यामुळे दराची विभागणी करता येत नाही.

राज्यातील साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधून तयार होणाऱ्या विजेची खरेदी अजूनही राज्य शासनाकडून झालेली नाही. याबाबत श्री. पवार यांनी राज्य शासनाकडे या मुद्द्याचा पुन्हा पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.

सहवीजनिर्मितीबाबत स्वतः पंतप्रधानांनीच जाहीर भूमिका मांडली आहे. त्यामुळे किमान केंद्र सरकारच्या विचारांशी सुसंगत असलेल्या राज्यांमध्ये तरी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कारखान्यांकडून पर्यावरणपूरक वीजनिर्मिती होते आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील त्यासाठी अनुकूल आहेत, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले. डॉ. स्वामिनाथन यांची भूमिका योग्य हरितक्रांतीनंतर आता पोषणमूल्य असलेल्या अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी प्रयत्न करावे लागतील, अशी डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. त्यांनी एका चांगल्या मुद्द्याला दिशा दाखविली आहे. अर्थात, त्यासाठी संशोधन वाढवावे लागेल, असे श्री. पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पुराणमतवाद्यांमुळे जीएम संशोधन थांबले ऊस विकास चर्चासत्रात जीएम उसाचा मुद्दा उपस्थित झाला. या वेळी श्री. पवार म्हणाले, की काही पुराणमतवादी सर्वोच्च न्यायालयात गेले. देशी वाणात बदल न करण्याची मागणी त्यांनी केल्यानंतर दुर्दैवाने न्यायालयाने देखील तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता संशोधन व चाचण्या थांबल्या आहेत. इतर काही देशांत संशोधन होत असताना भारतात मात्र ही स्थिती आहे. महाराष्ट्रात मराठवाड्याची गरज लक्षात घेत व्हीएसआयचे विभागीय संशोधन केंद्र जालना भागात सुरू केले जाणार आहे. त्यासाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी खात्याच्या बियाणे प्रक्षेत्राची जागा वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे. अजून महसूलमंत्र्यांची मंजुरी अपेक्षित आहे, असेही श्री. पवार म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com