कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटक

कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटक
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटक

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता कुटुंब घटक न मानता व्यक्ती घटक मानण्याबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.२०) विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. यामुळे कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पती/पत्नी व मुले यांना प्रत्येकी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.  सदस्य प्रकाश आबिटकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री पाटील म्हणाले, की कर्जमाफी योजनेंतर्गत ५८ लाख खातेदार असून आतापर्यंत १५ हजार ८८२ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेंतर्गत कुटुंब या घटकाऐवजी व्यक्ती हा घटक मानण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकरी सन्मान योजनेसाठी कुटुंब घटक न मानता व्यक्ती घटक माणून कर्जमाफी मिळणार आहे. याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळत होती. म्हणजे कुटुंंब प्रमुखाला कर्जमाफी मिळाल्यामुळे पत्नी किंवा मुलाला मिळत नव्हती. आता कुटुंबातील ज्या व्यक्तींच्या नावावर कर्ज आहे, त्या सर्वांना कर्जमाफीचे लाभ मिळतील. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्नाबाबत उत्तर देताना राज्यमंत्री म्हणाले, की या जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. त्यापैकी १ लाख ८८ हजार खातेदारांना ३७७ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित ८२ हजार शेतकऱ्यांच्या ऑनलाईन माहितीत त्रुटी असल्याने रक्कम जमा झालेली नाही. या त्रुटींची पूर्तता करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल.या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार, दीपक चव्हाण, किशोर पाटील, चंद्रदीप नरके, शंभूराजे देसाई, समीर कुणावार यांनी भाग घेतला. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत, १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार रुपयांवरील शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजना लागू केली. तसेच २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचेही घोषित केले होते. सुरवातीला ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल अशी घोषणा सरकारने केली होती.  दरम्यान, २००८ मधील कर्जमाफीच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या २००१ ते २००९ पर्यंत थकीत असलेल्या खातेदारांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी घोषणा सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. २०१६-१७ मधील जे थकीत खातेदार आहेत, त्याचा आढावा घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य अशी योजना तयार केली जाईल, असेही सांगण्यात आले. तसेच पीक कर्जासोबत मुदत कर्जाचाही समावेश करून यात शेती, इमू पालन, शेडनेट, पॉलिहाऊस यासाठीच्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचाही समावेश केला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रती कुटुंब दीड लाखांच्या मर्यादेत कर्जमाफीची अट होती, मात्र आता प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कुटुंबाची थकबाकीची एकूण रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांना दीड लाखावरील रक्कम आगाऊ भरल्यानंतर शासनातर्फे दीड लाख कर्जमाफीचा लाभ देण्याचा निकष होता. आता शासनाने अशा प्रकरणी कुटुंबाची अट शिथिल केली असून, प्रत्येक कर्जदारास दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. यामुळे कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पती/पत्नी व मुले यांना प्रत्येकी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने एकरकमी परतफेड योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची भरावी लागणारी रक्कम कमी होणार आहे. यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होणार आहे, असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com