वाशीम : कमी पावसामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ७७४ महसूल गावांची २०१७-१८ मधील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या गावांमध्ये विविध प्रकारच्या अाठ सवलती लागू करण्यात आल्या अाहेत.
गत वर्षी कमी पाऊस झाल्याने पिकांची उत्पादकता घटली होती. शिवाय विविध प्रकल्प कोरडेच राहिले. यामुळे खरिपातील पैसेवारीसुद्धा ५० पैशांच्या अात अालेली अाहे. अशा गावांना शासनाच्यावतीने विविध उपाययोजना लागू करण्यात अाल्या अाहेत.
उपाययोजनांमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित न करणे अशा एकूण आठ उपाययोजना जिल्ह्यातील ७७४ महसुली गावात लागू झाल्या आहेत.
यामध्ये वाशीम तालुक्यातील १३१, मालेगाव तालुक्यातील १२२, रिसोड तालुक्यातील १००, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ पैकी ११८, कारंजा तालुक्यातील १६७ व मानोरा तालुक्यातील १३६ गावांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात अाली अाहे.