तज्ज्ञांनी दिला शाश्वत डाळिंब शेतीचा कानमंत्र

''शाश्वत डाळिंब शेती'' विषयाच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलताना तज्ज्ञ.
''शाश्वत डाळिंब शेती'' विषयाच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलताना तज्ज्ञ.

जालना (प्रतिनिधी) : शाश्वत डाळिंब शेतीचा मार्ग नेमका कोणता याचा कानमंत्र तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. निसर्गाचं देणं शेतीत कस उपयोगी पाडता येईल यासोबतच डाळिंब फळबागेचे व्यवस्थापन नेमके कसे करावे याचा वस्तुपाठ शनिवारी (ता. ११) जालन्यात पार पडलेल्या ''शाश्वत डाळिंब शेती'' विषयाच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात घालून देण्यात आला.

अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संशोधन संघ, पुणेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्‌घाटन सत्राला जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे अध्यक्ष शहजीराव जाचक, अनुभवी शेतकरी भागवत पवार, राहुल रसाळ, भाऊसाहेब काटे, दिलीप अहिरेकर, राजेंद्र जठार, पुष्कर गुगरदरे व राहुल जठार आदींची उपस्थिती होती.

उद्‌घाटन सत्रानंतर औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांच्या डाळिंब शेतीतील प्रश्नांचा तास झाला. निर्यातक्षम मालाचे उत्पादन कसे घ्यावे, छाटनीची पद्धत, निर्यातीसाठी बहार नियोजन नेमके कसे करावे, खताचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन मार्केटचा नेमका अंदाज कसा घेता येईल आदींविषयी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अनुभवी शेतकऱ्यांशी साधलेल्या प्रश्नरूपी संवादातून जाणून घेतले.

डॉ. हरिहर कौसाडीकर यांनी अन्नद्रव्य व बाहेर व्यवस्थापनातील मराठवाड्यातील डाळिंब उतापादकाना जाणवणाऱ्या समस्या, त्याची कारणे, त्यावरील उपाय यावर प्रकाश टाकला. सूक्ष्म अन्नद्रव्याची जमिनीतील कमतरता जाणून घेऊन त्यानुसार खताचे व्यवस्थापन आवश्यक आहे. रेस्ट काळात आवश्यक खत व फवारणीचे तंत्र याविषयी घ्यावयाची काळजी, रोगावर नंतर उपाय करण्यापेक्षा आधीच उपाय नेमके कसे योजावे यावरही श्री. कौसाडीकर यांनी मार्गदर्शन केले.

दीपक जंजिरे यानी ठिबक सिंचन प्रणाली व ऑटोमायजेशन याविषयी माहिती दिली. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र पुणेचे सहयोगी संचालक डॉ. विनय सुपे यांनी शाश्वत डाळिंब शेतीचा नेमका मार्ग कोणता याविषयी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले.

डॉ. सुपे म्हणाले, शाश्वत डाळिंब शेतीसाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे आहे. गुटीनेच डाळिंबाची लागवड करावी. यामध्ये प्रतिकारक्षमता जास्त असते. झाडाची मूळ आणि पान फळांचा आकार वाढवितात. त्यामुळे मूळ आणि पान सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे. कनॉपी व्यवस्थापन महत्त्वाचे असून पानांचा टीएसएस १२ च्या पुढे आल्यास झाड हेल्दी समजा. झाडाची पाण्याची गरज ओळखून पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे सांगून निसर्गदत्त पद्धतीने फळबाग व बहर व्यवस्थापन नेमके कशा पद्धतीने करता येईल याची माहिती डॉ. सुपे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com