अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग क्षेत्रात मुबलक रोजगार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : वस्त्रोद्योग व अन्न प्रक्रिया उद्योगात रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. मात्र पॅकेजिंग व ब्रँडिंग प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. आपल्या उत्पादनाला केवळ देशातच नाही तर जागतिक बाजारपेठेत मागणी वाढावी असे वाटत असेल तर आकर्षक पॅकेजिंग व उत्तम ब्रँडिंग काळाची गरज आहे. यातूनसुद्धा रोजगार निर्मिती होणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेच्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा सूर चर्चासत्रात उमटला.

मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स २०१८ या परिषदेत आयोजित एम्प्लॉयमेंट इंटेनसिव्ह इंडस्ट्रीज (प्रक्रिया उद्योग व वस्त्रोद्योग) या चर्चासत्रात गौतम सिंघानिया, अनिशा धवन, अवनी दावडा, जमशेद दाबू, लार्स दिथमेर व संकल्प पोटभरे हे उद्योग क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

‎वस्त्रोद्योग क्षेत्रात रेमंडने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला आहे. चारशेपेक्षा जास्त शहरात रेमंड व्यवसाय सुरू आहे. मेक इन इंडियानंतर रेमंडने महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचे ठरविल्याचे गौतम सिंघानिया यांनी सांगितले. महाराष्ट्रात टेक्सटाईल पार्क उभारणारे रेमंड हे पहिले आहे. यवतमाळ येथे रेमंडचे युनिट आहे. अमरावती येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये ही रेमंड आपले युनिट लावत आहे. रेमंडने महाराष्ट्रात ५ हजार थेट रोजगार निर्माण केले आहेत. रेडिमेड गारमेंटला भविष्यात संधी असल्याचे श्री. सिंघानिया म्हणाले.

टाटा हे नाव जगात परिचित आहे. अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पुरवठा, मागणी या दृष्टीने महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे. शेती उत्पादनात वाढ झाल्यास रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. आम्ही शेतकऱ्यां सोबत अन्न प्रक्रिया क्षेत्रात चांगले काम करत आहोत, असे जमशेद दाबू यांनी सांगितले. ८६ टक्के व्यवसाय हा अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाला महाराष्ट्रात चांगले भविष्य असल्याचे संकल्प पोटभरे यांनी सांगितले.

अन्न प्रक्रिया उद्योग मागणीवर आधारित आहे. अन्न प्रक्रिया रिटेलिंगमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगाराच्या संधी आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगात रोज नवनवीन उत्पादन बाजारात येतात, त्यामुळे कुशल मनुष्यबळाची खूप मोठी मागणी या क्षेत्राला आहे. मात्र कौशल्य प्राप्त तरुणांची वाणवा या क्षेत्रालाही जाणवत आहे. महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकासाच्या दृष्टीने चांगले पाऊल टाकले आहे. परंतु शेतमालाला भाव न मिळाल्याने शेतकरी शेतमाल रस्तावर फेकताना दिसतो. अशा परिस्थितीत अन्न प्रक्रिया उद्योगावर याचा विपरीत परिणाम होतो असे वाटत नाही का?

यावर मत मांडताना अवनी दावडा म्हणाल्या, योग्य वेळी योग्य पीक घेण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागणार आहे. शेतकरी व शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात असंघटित आहे. शेतकरी आणि उद्योग यांच्यामध्ये थेट व्यवहार व्हावा. सध्या ब्रँडिंगचा जमाना आहे. त्यामुळे आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंग अतिशय आवश्यक आहे. पॅकेजिंग आणि ब्रँडिंग गरजेचे असून यातूनसुद्धा रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतात, असे या चर्चासत्रात वक्त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com