अमरावती ः खारपाणपट्ट्यासह जिल्ह्यात शाश्वत सिंचनाची सोय व्हावी, या उद्देशाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या अंमलबजावणीला कृषी विभागाकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यातंर्गत अवघ्या ९ आठवड्यांत जिल्ह्यात शेततळ्याची ६४२ कामे पूर्णत्वास गेली आहेत.
जिल्ह्याला ४५०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आहे. यापैकी कृषी विभागाने २४३५ शेततळ्यांचे काम पूर्ण केले आहे. दारिद्रयरेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबात आत्महत्या झाली आहे, त्यांच्या वारसांना निवडप्रक्रियेतील ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्याने त्यांची निवड योजनेसाठी केली जाते. शेततळी मागणी करणाऱ्या इतर सर्व संवर्गातील शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वावर निवड केली जाते.
या योजनेसाठी शेतकऱ्याच्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. शेततळ्यासाठी कृषी विभागाकडून किमान २६ हजार रुपये तर कमाल ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. खारपाणपट्ट्यातील भातकुली तालुक्यात सर्वाधिक दोन हजार तर दर्यापूर तालुक्याला १२०० शेततळ्यांचा लक्षांक आहे.
जिल्ह्यात दोन वर्षांपासून ही योजना राबविली जात आहे.
तेव्हापासून आतापर्यंत सर्वाधिक १०९५ शेततळी भातकुली तालुक्यात झाली आहेत. त्यापाठोपाठ अंजनगावसूर्जी येथे २१७, अमरावती येथे १०८, चांदूरबाजार येथे १०५, अचलपूर येथे १३३ याप्रमाणे शेततळ्यांचे काम झाले आहे. सद्यःस्थितीत २७० शेततळ्यांचे काम सुरू आहे. योजनेअंतर्गंत आतापर्यंत १८०२ शेतकऱ्यांना ७ कोटी ९२ लाख ५५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.
खारपाणपट्ट्यात सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्याच्या प्रयत्नाअंतर्गंत या भागात शेततळ्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पुढाकार घेतला जात आहे.