सातारा: मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून उद्दिष्टाचा दीडपट म्हणजेच ३३५९ अर्ज प्राप्त झाले असून, ८२९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ८८७ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर असल्याने लवकरच एक हजार शेततळ्यांचा टप्पा पूर्ण होईल.
शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरेल, या उद्देशाने राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. या योजनेतून जिल्ह्यात दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर योजनेतील काही अटी शिथिल केल्यामुळे या योजनेस प्रतिसाद वाढला आहे.
जिल्ह्यात ठेवण्यात आलेल्या दोन हजार शेततळ्याच्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ३३५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये २८१७ अर्ज पात्र तर ४७७ अर्ज अपात्र ठरले असून, ६५ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी २४०० अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. २१३५ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे.
सध्या ८८७ शेततळ्यांचे काम सुरू असून, ८२९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. ८२४ शेततळ्यांसाठी अनुदानापोटी ३ कोटी ७४ लाख ९२ हजार रुपये वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना या योजनेत लाभ घेता येत असल्याने या योजनेस शेतकऱ्यांकडून प्रतिसाद वाढत आहे. शेततळ्यांची उभारणीमुळे आगामी पावसाळ्यात शाश्वत पाणीसाठा होणार असल्याने शेतीसाठी त्याचा फायदा नक्कीच होणार आहे.