संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

शेतकरी गटही विकणार अनुदानित दरांप्रमाणे हरभरा बियाणे

अकोला : शेतकरी गटांकडून ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत दरवर्षी हजारो क्विंटल बियाणे उत्पादित केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना चांगले व स्थानिक बियाणे मिळत होते. मात्र यासाठी शासनाकडून गटांना म्हणजेच पर्यायाने बीजोत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला मिळणारे अनुदान गेल्या खरीप हंगामापासून बंद करण्यात अाले अाहे. त्यामुळे शेतकरी गटांनी उत्पादित केलेले हजारो क्विटंल हरभरा बियाणे अनुदानित दरांप्रमाणेच स्वतःच विक्री करण्याचा निर्णय घेतला अाहे.

शेतकरी गटांना ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत दरवर्षी क्विंटलला अनुदान मिळत होते. मात्र बीजोत्पादन कार्यक्रमातून तयार झालेल्या बियाण्याला गेल्या खरीप हंगामापासून शासनाकडून मिळणारे अनुदान बंद करण्यात अाले अाहे. वारंवार मागणी करूनही शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले असून, रब्बीमध्येही अनुदान मिळण्याची तीळमात्र शक्यता नसल्याने शेतकरी गटांनी उत्पादित हजारो क्विटंल हरभरा बियाणे स्वतःच विक्री करण्याचा निर्णय घेतला अाहे.

या रब्बी हंगामासाठी ‘महाबीज’कडून हरभरा बियाणे ज्या अनुदानित दराने दिले जात अाहे, त्याच ६५ रुपये किलो रुपये दराने गटांकडून जॉकी ९२१८ हे हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात अाले अाहे.    

शासनाने प्रोत्साहन दिल्याने प्रत्येक जिल्ह्यात विविध शेतकरी गट तयार झाले व त्यांनी ग्रामबीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला. या गटांनी उत्पादित केलेले बियाणे विकत घेऊन कृषी विभाग शेतकऱ्यांना देत होता. यासाठी शेतकरी गटांना प्रतिक्विंटलला सुमारे २५०० रुपयापर्यंत दर मिळत होता. मात्र या सरकारच्या काळात अधिकाऱ्यांनी निर्णय घेत गटांना बीजोत्पादनासाठी दिलेले जाणारे अनुदान या खरिपापासून थांबविले.

शेतकरी गट, कंपन्यांनी तयार केलेल्या बीजोत्पादनाला अनुदान मिळावे, यासाठी तालुक्यापासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्यात अाला. मात्र शासनाने या मागणीकडे अखेरपर्यंत लक्षच दिले नाही. त्यामुळे खरिपात हजारो क्विंटल सोयाबीन बियाणे पडून होते.

रब्बी हंगामातही शासनाकडून हरभरा बियाण्याला अनुदान मिळण्याची शक्यता नसल्याने शेतकरी गटांनी अखेरीस स्वतःच पुढाकार घेत शासन ज्या प्रमाणे अनुदानावर ६५ रुपये किलोने हे बियाणे देत अाहे, त्याच दरात अापले बियाणे देण्याचे ठरविले अाहे.

प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यातील शेतकरी गट, कंपन्यांनी पुढाकार घेतला. या जिल्ह्यातील श्री. बाळनाथ शेतकरी कृषी विज्ञान मंडळ ६०० क्विंटल, किनखेडा येथील संत ज्ञानेश्वर शेतकरी गट दीड हजार क्विंटल अाणि देऊळगाव बंडा येथील देवळेश्वर कंपनी ५०० क्विंटल बियाण्याची या दराने विक्री करीत अाहे. यासाठी या गट, कंपन्यांनी स्वतःची प्रचार यंत्रणा कामाला लावली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com