कर्जमाफी
कर्जमाफी

शेतकरी १५ हजार अनुदानास पात्र; माफी ३३९ रुपयांची

सदर शेतकऱ्याची कर्जाची संपूर्ण माहिती आम्ही शासनाला कळवलेली आहे. त्याला एवढीच रक्कम का भेटली याबद्दल आपण भाष्य करू शकत नाही. - सुनील परदेशी , सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अंबाजोगाई

बीड : दिवाळीनंतर तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीच्या योग्य रकमा पडतील ही शेतकऱ्यांची अपेक्षा पुन्हा एकदा पोकळ ठरणार असल्याचे चित्र आहे. कर्जदार शेतकऱ्यांना देण्यासाठी ग्रामीण बँकेला ३५ कोटी तर जिल्हा मध्यवर्ती बँकेला ९२ लाख रुपये आले असले तरी अद्याप याद्यांमधील सॉफ्टवेअरमुळे झालेले घोळ सुरूच असल्याने अद्याप जिल्ह्यात एकही शेतकऱ्याच्या खात्यावर दमडीही पडली नाही. मात्र, नुकत्याच प्राप्त झालेल्या यादीत एक शेतकरी १५ हजार रुपयांच्या अनुदान पात्र केवळ ३३९ रुपये मिळाले आहेत.

नरहरी यशवंत गायके (रा. पुस, ता. अंबाजोगाई) यांच्याकडे २० हजार रुपयांच्या दरम्यान कर्ज असून ते कर्जाची नियमित परतफेड करतात. शासनाच्या पाच जलैच्या आदेशानुसार ते किमान १५ हजार रुपयांच्या अनुदास पात्र ठरत असताना शासनाकडून आलेल्या यादीत त्यांचे माफीच्या यादीत नाव असून त्यांना केवळ ३३९ रुपयांचा लाभ झाला आहे.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. नापिकी आणि दुष्काळामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना जगण्यापेक्षा मरण सोपे वाटत आहे. दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीच्या रकमा पडतील ही घोषणा पुरती पोकळ ठरली असून कर्जमाफीच्या याद्या आणि रकमा ३१ ऑक्टोबरला आल्या. जिल्हा बँकेकडे २३६ शेतकऱ्यांसाठी ९२ लाख तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ५७०० शेतकऱ्यांसाठी ३४ कोटी रुपये आले. मात्र, सरकारच्या सॉफ्टवेअरने याद्यांमध्ये घोळ केलेला असून एकाच कुटुंबातील दोघे अशा अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे हा घोळ सुरूच असून अद्याप एकही शेतकऱ्याच्या खात्यावर दमडीही पडली नाही.

दरम्यान, नरहरी यशवंत गायके या शेतकऱ्याला १५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणे गरजेचे असताना या शेतकऱ्याला ३३९ रुपयांची कर्जमाफी देऊन त्यांची बोळवण केली आहे. पुस (ता. अंबाजोगाई) येथील अडीच एकर जमीन असलेल्या नरहरी यशवंत गायके यांनी जून २०१५ मध्ये सेवा सोसायटीकडून घेतलेले १९८०० रुपयांचे कर्ज त्यांनी जून २०१६ मध्ये १९५०० रुपये फेडले. पुन्हा याच महिन्यात त्यांनी १९८६० रुपये कर्ज घेऊन तेवढे कर्ज यंदा जून महिन्यात फेडले.

त्यामुळे नियमित परतफेड करणारे शेतकरी म्हणून त्यांना १५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळायला हवे होते. मात्र, त्यांना त्यांच्याकडील कर्जभरून बाकी राहिलेले ३०० रुपये आणि त्यावरील ३९ असे केवळ ३३९ रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. विशेष म्हणजे, ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांची जमवा जमव करणे, यंत्रणा सुरू नसल्याने खेटे मारणे अशा विविध कारणांसाठी त्यांचा पाचशेहून अधिक खर्च झाला असून मन:स्ताप झाला तो वेगळाच.

काय म्हणतो शासनादेश २०१५ - १६ मध्ये घेतलेले कर्ज जून २०१६ मध्ये परतफेड केले आणि जून २०१६ - १७ ला घेतलेल्या कर्जाची रक्कम जून २०१७ मध्ये परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये ही रक्कम देण्यात येईल. मात्र, ही रक्कम किमान १५ हजार रुपये असेल असे ता. पाच जुलैला काढलेल्या शासनादेशात म्हटले आहे. त्यामुळे नरहरी गायके यांना १५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणे गरजेचे होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com