शेतकरी आंदोलनाचे विधिमंडळात तीव्र पडसाद

शेतकरी आंदोलनाचे विधिमंडळात तीव्र पडसाद
शेतकरी आंदोलनाचे विधिमंडळात तीव्र पडसाद

मुंबई : शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचे तीव्र पडसाद सोमवारी (ता. १२) राज्य विधिमंडळाच्या कामकाजातही उमटले. विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या आमदारांनीही आंदोलकांच्या मागण्या लावून धरल्या. दरम्यान, या शिस्तबद्ध मोर्चकऱ्यांच्या सगळ्या मागण्या कालबद्धरीतीने सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी विधानसभेत दिले. राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान सदस्य पतंगराव कदम यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. विधिमंडळाचा एखाद्या विद्यमान सदस्याचे निधन झाल्यास कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची प्रथा आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेवर फक्त त्यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. हा शोकप्रस्ताव सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात ठोस निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षातील सदस्यांनी शेतकरी मोर्चाच्या बाबतीत केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, नाशिकपासून मुंबईत हा मोर्चा आला. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चर्चा केली. मात्र, ते ठाम होते, त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला. त्यांचे विषय महत्त्वाचे असल्याने त्यांना सर्वांचा पाठिंबा आहे. आम्ही सरकार असल्याने समर्थन देऊ शाकत नाही, तर प्रश्न सोडवू. आम्ही समिती निर्माण केली आहे. कालबद्ध पद्धतीने त्यांच्या मागण्या पूर्ण करू. शिष्टमंडळास मी एक वाजताची वेळ दिली आहे. त्यापूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणाले, की शोकप्रस्ताव महत्त्वाचा असला तरी शेतकरी मोर्चाही महत्त्वाचा आहे. सरकारने या गरीब शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आजच निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा. आजित पवार म्हणाले, की नाशिकचे पालकमंत्री या मोर्चेकऱ्यांना सहा दिवसांपूर्वी भेटले होते. तर त्यांनी त्या दिवशीच त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. ते पायी अनवाणी चालत मुंबईत धडकले अहेत. यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशामुख म्हणाले, की हा निर्धार मोर्चा आहे. सरकारने या शेतकऱ्यांचे प्रश्न ताबडतोब सोडवावेत. कारण त्यांनी निर्धार केला आहे, त्यामुळे ते मुंबईततून हलणार नाहीत. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. सरकारने समिती नेमली असली, तरी ताबडतोब निर्णय घ्यावा. यानंतर शिवसेनेचे शंभुराज देसाई म्हणाले, की या मोर्चेकऱ्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतात. त्यामुळे सरकारने ताबडतोब सर्व मागण्या मान्य कराव्यात. आमचे गटनेते एकनाथ शिंदे, नेते आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन ते मोर्चात चालत आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com