वरवंड, जि. पुणे ः शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांना सरकारने गुंगारा दिल्याने दौंड तालुक्यातील कानगाव येथे गुरुवारी (ता.२) अखेर राज्यव्यापी आक्रोश आंदोलन व शेतकरी संपाची ठिणगी पडली.
सकाळी शेतकरी, महिला, मुले, ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन आक्रोश आंदोलनाची मशाल पेटवून प्रभात फेरी काढली. देवीच्या मंदिरातील गाभारा व कळसावर दूध ओतून अभिषेक केला. या वेळी सरकारला शेतकरीहिताच्या धोरणाची सतबुद्धी देवो, अशी जोरदार मागणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या नियोजित मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत गावात वेगवेगळ्या पद्धतीने चक्री आंदोलन व संप सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखविला.
सरकाने शेतीविरोधी धोरणांचा सापाटा लावल्याने बळिराजा आर्थिक संकटाच्या खाईत आहे. त्यातच सरकाने दिशाभूल करणाऱ्या कर्जमाफीचे गाजर दाखविले असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य किसान मोर्चाचे समन्यवक व शेतकरी कामगार पक्षाचे नेते शांताराम कुंजीर यांनी २ नाव्हेंबरपासून राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाची घोषणा केली होती.
त्यानुसार कानगावमध्ये आंदोलन व संप करण्यात अाला. या वेळी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन ‘शेतमाल आमच्या घामाचा नाही कोणाच्या बापाचा’ आदी घोषणांनी शिवार दणाणून सोडले.