अकोला ः वाशीम जिल्ह्यात सोयाबीनच्या भावाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर वळण घेत अाहे. सोयाबीन हमीभाव प्रश्नी शनिवारी (ता. ११) सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर-मुंबई महामार्गावर जऊळका रेल्वे येथे रास्ता रोको अांदोलन केले. अर्धा तास झालेल्या अांदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सोयाबीनला हमीभाव मिळावा, खरेदी केंद्रे सुरू करावीत यासाठी शेतकरी मागणी करीत अाहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना या मुद्द्यावर अाक्रमक झालेली असून सोमवारी (ता. १३) जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात मुक्काम अांदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला अाहे.
शनिवारी याच मुद्यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष दामोधर इंगोले यांच्या नेतृत्वात महामार्गावर बसून अांदोलन केले. या कार्यकर्त्यांनी सोयाबीन रस्त्यावर फेकले. प्रशासनाने तातडीने हमीभावाने सोयाबीनची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात अाली.