मराठवाड्यात पोचणार शेतकरी आंदोलनाची धग

मराठवाड्यात पोचणार शेतकरी आंदोलनाची धग
मराठवाड्यात पोचणार शेतकरी आंदोलनाची धग

नागपूर ः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आणि शेतीच्या प्रश्‍नांकडे राज्यकर्त्यांचे गेल्या अनेक वर्षांत दुर्लक्ष झाले. यातून या भागातील शेतीवरील अर्थकारण मोडकळीस आले आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत अनेकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. ही परिस्थिती बदलण्यासाठी विदर्भात आंदोलन सुरू झाले. त्यानंतर मराठवाड्यातही अशाचप्रकारचे आंदोलन केले जाईल, अशी माहिती माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी दिली.

अकोल्यातील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी नुकताच संवाद साधला. या वेळी यशवंत सिन्हा म्हणाले, की देशाच्या इतर भागांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची तीव्रता वाढली आहे. त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील शेती आणि शेतकरी वर्षानुवर्षे राज्यकर्त्यांनी दुर्लक्षित ठेवल्याने या क्षेत्राचे प्रश्‍न अधिकच गडद आणि गंभीर झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांचाच परिपाक आहे. शेतीला पाण्याची गरज राहते. त्या बळावर शेतकरी नवनवीन व व्यवसायिक पीकपद्धती अंगीकारू शकतो. परंतु या भागातील सिंचन प्रकल्प पूर्ण होऊच नयेत, याची खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे पारंपरिक व कोरडवाहू पीकपद्धतीशिवाय दुसरा पर्यायच शेतकऱ्यांसमोर नव्हता. शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाण झाल्याने त्यांचे कृषी निविष्ठा तसेच मार्केट या व्यवस्थेकडूनदेखील शोषण झाले. त्यांच्या शेतमालाला अपेक्षित दर मिळू नयेत, यासाठीदेखील अनेकांनी प्रयत्न केले.

चक्रव्यूहात फसल्यासारखी शेतकऱ्यांची अवस्था झाली. परंतु यातून बाहेर पडण्याचे कसब किंवा ज्ञान त्याला नसल्याने व्यवस्थेच्या याच चक्रव्यूहात त्याचा बळी गेला. हजारावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची दखल सरकारला घ्यावीशी वाटली नाही, ही शोकांतिका असल्याचे श्री. सिन्हा म्हणाले.

या परिस्थितीत बदल घडावा, शेती प्रश्‍नाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले जावे, याकरिता विदर्भात व त्यातही अकोल्यातून आपण आंदोलनाची सुरवात केली. यापुढील काळात अशाच प्रकारचे आंदोलन मराठवाड्यातदेखील केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच त्याची घोषणा होईल, असे ते म्हणाले. ...म्हणून अकोल्यात अांदोलन यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या, फवारणीदरम्यान विषबाधा होत अनेकांचे बळी गेले. त्यासोबतच बोंड अळीमुळेदेखील कपाशी उत्पादकांना फटका बसला. त्यामुळे यवतमाळमध्ये आपण आंदोलन का केले नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला असता. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात यापूर्वीच या प्रश्‍नावर अनेक आंदोलन झाल्याचे सांगितले.

शेतमालाला भाव मिळाला तर शेतकऱ्यांसमोरील सारेच प्रश्‍न संपतील. त्यामुळे शेतमालाला भाव या मुद्द्यावरच सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आपण आंदोलन सुरू केले व त्याकरिता मध्यवर्ती असलेल्या अकोल्याची निवड केली, असे यशवंत सिन्हा म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com