नगर : कृषी विभागातर्फे शेतीचा अभ्यास करण्यासाठी परदेशांत जाण्याकरिता जिल्हाभरातील सुमारे २९० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्या अर्जाची दोन दिवसांत छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर सोडत काढून वरिष्ठ क्रम निश्चित केला जाणार आहे. यात सर्वाधिक अर्ज राहाता तालुक्यातून तर सर्वांत कमी अर्ज जामखेड तालुक्यातून आलेले आहेत.
इस्राईल व अन्य देशांतील सुधारित शेतीचा अभ्यास करण्याची राज्यातील शेतकऱ्यांना संधी मिळावी, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना परदेशांत जाण्याची संधी दिली जाते. त्यासाठी कृषी विभागातर्फे पन्नास टक्के अनुदान दिले जाते.
आतापर्यंत नगर तालुक्यातील १५, पारनेरमधील २२, पाथर्डीमधील पाच, कर्जतमधील सात, जामखेडमधील चार, श्रीगोंद्यातील २८, श्रीरामपूरमधील १६, राहुरीमधील २६, नेवासे तालुक्यातील ३०, शेवगावमधील १९, संगमनेर तालुक्यातील २२, कोपरगावमधून १७, राहाता तालुक्यातील ४९, अकोले तालुक्यातील ३० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
या अर्जांची छाननी केली जात असून, पात्र-अपात्र निश्चित झाल्यानंतर वरिष्ठता यादी तयार करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांसमोर सोडत काढली जाणार आहे. त्यानुसार यादी तयार करून ती वरिष्ठ कार्यालयाला पाठवली जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे व तंत्र अधिकारी अशोक संसारे यांनी सांगितले. परदेशांतील शेती अभ्यासासाठी किती शेतकऱ्यांना संधी द्यायची हे वरिष्ठ पातळीवर निश्चित केले जाणार आहे.