गुलाबी बोंडअळी
गुलाबी बोंडअळी

कापसाऐवजी बोंड अळीचेच पीक; शेतकरी हतबल

मी चार एकरांत प्री-मॉन्सून कपाशीची ठिबकवर लागवड केली. दरवर्षी जेथे एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उतारा राहायचा तेथे या वर्षी अवघा एकरी पाच क्विंटल कापूस झाला. अाताही कपाशीवर बोंड्या होत्या. मात्र प्रत्येक बोंडात अळी असल्याने कापूस वेचणे कठीण झाले होते. त्यामुळे ही कपाशी उपटून फेकली. जेमतेम खर्चसुद्धा निघू शकलेला नाही. - सुरेंद्रसिंग जाधव, टाकरखेड, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यात पंधरा हजारांवर तक्रार अर्ज  बुलडाणा  : बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे उत्पादन केवळ १० ते २० टक्क्यांवर अाले अाहे. शिवाय निघत असलेला कापूससुद्धा चांगल्या दर्जाचा नसल्याने दरही कमी मिळत आहेत. बोंड अळीने नुकसान झाल्याबाबत शेतकऱ्यांडून कृषी विभागाकडे अर्ज केले जात असून, अातापर्यंत १५ हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले असून, दररोज अर्जांची संख्या वाढतच आहे. यावरूनच बोंड अळीच्या नुकसानीची तीव्रता स्पष्ट होत अाहे.   जिल्ह्यात या हंगामात पावणेदोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली अाहे. मागील वर्षी कपाशीला चांगले दर मिळाल्याने शेतकरी या पिकाकडे वळाले होते. काहींनी प्री-मॉन्सून लागवड केली, तर काहींनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर लागवड केली. कपाशीचे पीक सुरवातीच्या काळात चांगले दिसत असतानाच बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत गेला. प्रत्येक बोंडामध्ये अळी शिरल्याने कपाशीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला.  जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मलकापूर, खामगाव, नांदुरा, मोताळा, संग्रामपूर, जळगाव जामोद अादी सर्वच तालुक्यांतील कपाशीच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला अाहे. यामुळे शेतकरी पूर्णतः धास्तावले अाहेत. कृषी विभागाकडे नुकसानीबाबत अर्जांचा खच तयार होत अाहे. दर दिवसाला दोन ते अडीच हजार शेतकरी अर्ज सादर करीत अाहेत. अर्ज देण्यासाठी कृषी विभागात गर्दी होत अाहे. शेतकऱ्यांचे बोंड अळीमुळे पूर्णतः नुकसान झाले अाहे. लागवड खर्चही निघालेला नाही. अालेल्या तक्रारींपैकी काहींच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणीसाठी कृषी विभागाचे कर्मचारी जात अाहेत. परंतु ग्रामपातळीवर काम करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने ताण निर्माण झाला अाहे. यवतमाळ जिल्‍ह्यात ३४ हजार तक्रारी

यवतमाळ : कापसावर आलेल्या बोंड अळीने शेतकरी संकटांत सापडले आहेत. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील दोन लाख हेक्‍टरवरील पीक प्रभावित झाले आहे. गुरुवार (ता. ३०) पर्यंत जिल्ह्यातील तब्बल ३४ हजार शेतकऱ्यांनी बोंड अळीबाबात कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे याबाबत अजूनही पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यात यंदा साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झालेली आहे. त्यातील तब्बल ९० टक्के क्षेत्रावर बीटीची लागवड आहे. मात्र, यंदा बोंड अळीने कहरच केला. बीटीवर आलेल्या बोंड अळीने जिल्ह्यातील दोन लाख हेक्‍टरवरील पीकबाधित झाले. परिणामी, शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोंड अळीच्या आक्रमणामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. असे असतानाही अद्याप पंचनामे करण्याचे आदेश न आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  बोंड अळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानंतर आतापर्यंत तब्बल ३४ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. ‘जी’ नमुन्यात या तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींची तपासणी केली जाणार आहे. मात्र, अद्याप पंचनामा करण्याचे आदेश न आल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

फवारणी प्रकरणात बीडीओंना नोटीस जिल्ह्यात फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यानंतर फवारणीचा १६ गटविकास अधिकाऱ्यांना खुलासा मागण्यात आला होता. मात्र, ‘बीडीओ'' यांनी अहवाल न दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी कारणे दाखवा नोटीस (शोकॉज) दिली आहे.  ‘शोकॉज’चे सोपस्कार फवारणी प्रकरणात चौकशी झाली, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वगळता इतर कोणावरही या प्रकरणात कारवाई झाली नाही. त्यामुळे ‘शोकॉज’ हे सोपस्कार असल्याची टीका होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com