शेतीप्रश्‍नी लढ्यासाठी आता किसान आर्मी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : शेतीप्रश्‍नांवर सरकारसोबत आरपारच्या लढाईसाठी आता लढवय्या आणि मोजक्‍याच शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या किसान आर्मीची स्थापना केली जाईल. आत्महत्येचा विचार करत असलेल्या शेतकऱ्यांनी या आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.

राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी त्यांनी प्रत्येकवेळी शेतकरी प्रश्‍नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष केले. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ततादेखील सरकार करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत साततत्याने वाढ होते.

आंदोलन, उपोषण आणि मोर्चे याचाही सरकारवर परिणाम होत नाही. त्यामुळे शेतीप्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी शत्रुशी युद्धकर्त्या सैन्याच्या धर्तीवर किसान आर्मीची उभारणी केली जाईल, अशी माहिती आमदार कडू यांनी बोलताना दिली. किसान आर्मीत आत्महत्येचा विचार असणाऱ्या शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. मरणापेक्षा लढणे केव्हाही योग्य, असा संदेश त्यांना दिला जाणार असल्याचे सांगितले.

सरकारला वर्षभराचा ''अल्टिमेटम'' शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ केली. परंतु त्यांना हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत गेल्या अनेक वर्षात बदल झाला नाही. ही परिस्थिती बदलण्याचा आमचा प्रयत्न राहील. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर वर्षभरात कोणताच निर्णय घेतला नाही, तर किसान आर्मी आपल्या कामकाजास सुरवात करेल, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

शेतीप्रश्‍नांवर लढवय्या शेतकऱ्यांचे हे संगठण राहील. त्याचे नामकरण किसान आर्मी असे करण्यात आले आहे. आत्महत्येच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांना यात सहभागी करून घेतले जाईल. सैन्याप्रमाणे हे शेतीप्रश्‍नी आक्रमक लढा देतील. त्यामुळेच आर्मी शब्दप्रयोग वापरला आहे. - बच्चू कडू, आमदार, अचलपूर-परतवाडा मतदारसंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com