दुष्काळाची व्यथा मांडताना महिला शेतकऱ्यास रडू कोसळले

दुष्काळाची स्थिती सांगताना शेतकरी
दुष्काळाची स्थिती सांगताना शेतकरी

निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍याच्या कणसात दाणेच नाहीत, तर वाढ न झालेल्या कपाशीला चार-पाच कैऱ्यांमुळे एकरी चाळीस-पन्नास किलो कापूस निघाल्यास खर्च कसा भागणार, अशी व्यथा मांडणाऱ्या गेवराई शेमी येथील महिला शेतकरी रुख्माबाई श्‍यामराव ताठे यांना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासमोर अक्षरशः रडू कोसळले.

दुष्काळाचे विदारक चित्र पाहून पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळाबाबत गंभीर असून, लवकरच मदत घोषित करतील, असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला. सिल्लोड तालुक्‍यातील निल्लोड महसूल मंडळातील दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता. १७) पालकमंत्री डॉ. दीपक सावंत औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाले. या वेळी आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे उपस्थित होते.

गेवराई शेमी, निल्लोड, चिंचखेडा, भवन या गावामधील औरंगाबाद-जळगाव महामार्गालगतच्या शेतात त्यांनी पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांसोबतच भाजप, कॉँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुष्काळ पाहणी दौऱ्यात कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार हे त्यांच्या गाडीला पक्षाचा झेंडा लावून फिरत असल्याने हा कार्यक्रम पक्षाचा नसून, शासकीय दौरा असल्याचा आक्षेप भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी घेतल्यानंतर झेंडा काढण्यात आला. मात्र नेते दुष्काळाबाबत किती गंभीर आहेत, याची नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com