सारखेच हेलपाटे मारावे लागत आहे...

खरेदी केंद्र
खरेदी केंद्र
सांगली ः सांगलीत हमीभावाने उडीद खरेदी केंद्र सुरू झालयं; पण त्याचा काहीच उपयोग नाही. हमीभावाने विक्री करण्यासाठी जतपासून शंभर किलोमीटरवर जायचं. त्याची नोंद करायची. नाफेडचा निरोप आल्यानंतर पुन्हा विक्रीसाठी सांगली गाठायची. यासाठी सारखेच हेलपाटे मारावे लागत आहेत. उडदाला ५४०० रुपये हमीभाव आहे; पण तालुक्‍यात खरेदी केंद्र नसल्यानं हमीभावापेक्षा १६०० रुपये प्रतिक्विलंटल कमी दराने उडदाची विक्री करावी लागत आहे. सांगलीत जाऊन उडदाची विक्री करणंदेखील परवडत नाही. आधी दुष्काळानं मारलं...आता सरकार मारतंय... अशी व्यथा उडीद उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील जत, खानापूर, तालुक्‍यासह कवठेमहांकाळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात उडीद पीक घेतले जाते. उडीद पिकाला हमीभाव ५ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. जिल्ह्यात सोयाबीनसह उडीद पिकाची खरेदी सुरू झाली आहे. हमीभाव मिळवण्यासाठी अगोदर शेतकऱ्यांनी सांगलीत येऊन त्याची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली पाहिजे.
नोंदणी करत असताना त्याचे नमुने दाखवावे लागणार आहेत. असे असतानाही जत तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणीही केली. नोंदणीनंतर त्यांनी उडीद विक्रीसाठी सांगलीत येऊ आले; मात्र उडदाची आर्द्रता, खराब दाणे, अपरिपक्व आदी निकषांच्या चाळणीमुळे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या शेतीमाल खरेदी करण्यास नकार मिळात आहे.
शंभर किलोमीटर अंतरावरून शेतीमाल आणणे व नेण्याचा खर्च हा परवडत नाही. त्यामुळे खानापूर, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती; मात्र या मागणीला बाजार समिती आणि संबंधित विभागाने केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे उडीद उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने त्याची विक्री करावी लागते आहे. उडीद पेरणीनंतर पावसाने दांडी मारली. यामुळे उत्पादनात घट झाली आहे. 
जिल्ह्यात केवळ तीनच खरेदी केंद्रे
जिल्ह्यात सोयाबीन, उडीद ही पिके घेतली जातात. शेतकऱ्यांनी प्रत्येक तालुक्‍यात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही केली होती; मात्र तसे न करता संबंधित विभागाने केवळ जिल्ह्यातील तासगाव, इस्लामपूर या दोन तालुके आणि सांगली येथील बाजार समितीत ती सुरू केली आहेत. यामुळे इतर तालुक्‍यातील बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांनी कमी दरात विक्री करावे लागते आहे. त्यामुळे उर्वरित तालुक्‍यात खरेदी केंद्रे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शासनाने जत येथे उडीद खरेदी केंद्र सुरू न केल्याने सांगली येथील उडीद खरेदी केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. बाजार समितीने जतमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. - महेश शिवणूर, उडीद उत्पादक शेतकरी, खोजनवाडी, ता. जत. जि. सांगली. जतमध्ये खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने 3400 रुपये प्रतिक्विंटल या दराने विकावे लागते आहे. केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित विभाग वेळकाढूपणा करत असल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीला सरकारच जबाबदार आहे.
- श्रीकांत शिंदे, वळसंग, ता. जत. जि. सांगली
शासनाच्या निकषानुसार 12 टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रता चालते. एफएक्‍यू दर्जानुसार शेतीमाल खरेदीचे बंधन आमच्यावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल वाळवून आणावा. - आर. एम. दानोळे, जिल्हा मार्केटिंग अधिकार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com