नाशिक ः कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचं जेवण असून शेतकऱ्यांना आजवर फक्त आशा लावून ठेवली आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झालेला दिसून येत नाही, असे सांगत वाढलेली महागाई, नोटाबंदी, शेतमाल किमतीची बिकट अवस्था अादी मुद्यांना अनुसरून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर चौफेर टीका केली.
ते सावरकरनगर येथील नंदनवन लॉन्स येथील शेतकरी अधिवेशनात बोलत होते. या वेळी किसान मंचचे निमंत्रक शंकरअण्णा धोंडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, आमदार जयंत जाधव यांच्यासह ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
या वेळी श्री. पवार म्हणाले, की शेतकरी चळवळीची सुरवात कायम नाशिकपासून होत असते. राज्यात आणि देशात शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. महागाईने देशात उच्चांक गाठला आहे. संपूर्ण जगात पेट्रोल आणि
डिझेलचे भाव घसरले आहेत; पण भारतात मात्र वाढतच आहेत. तेलासंदर्भात देशात लूट सुरू असून, सर्वसामान्य नागरिक मात्र आता त्रस्त झाला आहे.
आज शेतीमालाच्या किमतीची अवस्था बिकट झाली आहे. शेतकरी उद्धस्त झाला, तर देश उद्धस्त होईल. देशात हाहाकार माजेल. शेतीमालाच्या किमतीबरोबर खेळणे देशाला परवडणार नसून सरकारने लवकरात लवकर पावले उचलायला हवीत. आज बळिराजा गप्प आहे; उद्या जर शेतकरी रस्त्यावर उतरला तो कुणाच्या बापाला घाबरणार नाही. नाशिक जिल्हा कृषिप्रधान जिल्हा आहे; तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, याची खंत वाटते. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन या वेळी त्यांनी केले.
सरसकट कर्जमाफी देणार, असे भाजपने जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन पाळले नाही, असे ते म्हणाले.सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कर्जमाफी मुद्द्यावर त्यांनी टीका केली. सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही; त्यामुळे सामुदायिक ताकत दाखवण्याची वेळ आली अाहे, असे श्री. पवार म्हणाले.