यवतमाळ ः बोंड अळीने कापसाचे रान उदध्वस्त झाले असताना त्यापोटी नुकसान भरपाई देणे तर दूरच गाजावाजा करून घोषित केलेली कर्जमाफीदेखील मिळाली नाही, जुन्या कर्जाची परतफेड नाही म्हणून नवे कर्ज नाही. ऑनलाइनच्या नादात आमच जगणंच सरकार ऑफलाइन करते की काय? अशी भीती वाटत असल्याची भावनिक प्रतिक्रिया मडकोणा गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा मुक्काम शुक्रवारी (ता.१) रात्री मडकोना गावात झाला. शनिवारी (ता.२) या गावातील नागरिकांशी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, श्रीकांत पिसे पाटील यांनी संवाद साधला.
यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. पुढच्यावर्षी काय स्थिती राहील, कोणत्या पिकाची लागवड करावी किंवा कशी, याबाबत अद्यापही जागृतीसाठी यंत्रणा सरसावली नाही, अशी व्यथा या वेळी ग्रामस्थांनी मांडली. सरसकट कर्जमाफीच्या मुद्यावर मडकोणा ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे या वेळी ग्रामस्थांनी सांगितले.
जीवन बाबाराव माकडे आणि लता जीवन माकडे यांच्या घरी जात त्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. यावेळी लता माकडे भावनावश झाल्या आणि त्यांनी खासदार सुळे यांच्या गळ्यात पडून आपल्या आश्रूंना वाट मोकळी करुन दिली.