समृद्धी महामार्ग : थेट खरेदीतून शेतकऱ्यांना २०० कोटींचा मोबदला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात थेट खरेदीद्वारे १८६ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली असून त्यासाठी २०० कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला. १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.८) नाशिकचे उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांतून जाणाऱ्या या महामार्गासाठी आतापर्यंत सुमारे १८६.२९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, त्यापोटी सुमारे २१५.२९ कोटी रुपयांचा मोबदलाही शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध कायम असून काही शेतकऱ्यांनी थेट या महामार्गाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मात्र, काही लोकांच्या विरोधामुळे लाकोपयोगी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने न्यायालयात मांडली. राज्यातील ३० तालुके आणि ३५५ गावांतून जाणारा हा महामार्ग देशातील राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे.

राज्यातील २४ जिल्ह्यांचे अर्थकारण बदलणारा हा महाराष्ट्र राज्याला सक्षम करणारा असा नागपूर-मुंबई सुपर एक्सप्रेस कम्युनिकेशन-वे असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास साधला जाणार आहे. हा प्रकल्प झाल्यानंतर महाराष्ट्र हे देशातील एक नंबरचे सर्वात प्रगतिशील राज्य बनणार आहे. विकासाचा दर अन्य राज्यांपेक्षा कित्येक पटीने वाढणार असून २५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची भूमिका सरकारने मांडली आहे.

शासनाच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून असून समृध्दी महामार्ग हा त्यापैकीच एक आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत या महामार्गाबाबत जिल्ह्याचा प्रगती आलेख उंचावा याकरिता आता अधिकारी भूसंपादनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. दरम्यान, यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत गावनिहाय संपादनाची स्थिती जाणून घेण्यात आली.

सिन्नर तालुक्यात सर्वाधिक संपादन आतापर्यंत जिल्ह्यात ४४० शेतकऱ्यांकडून थेट खरेदी पद्धतीने जमीन संपादीत करण्यात आली आहे. यात सिन्नर तालुक्यातील २९३ व इगतपुरी तालुक्यातील ४४० शेतकऱ्यांचा सामावेश आहे. तसेच सिन्नर तालुक्यात १३२.९६ हेक्टर तर इगतपुरी तालुक्यातून ५३.३३ हेक्टर अशा एकूण १८६.२९ हेक्टर जमीनीचे संपादन करण्यात आले असून २१५.२९ कोटींचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. जमीन संपादनात सिन्नर तालुका आघाडीवर असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com