शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणार

शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणार
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणार

पुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते उत्पादन आणि त्यातुलनेत न मिळणारे दर, यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य पणन मंडळाने परराज्य शेतमाल विपणन संधीबाबत विविध ९ राज्यांचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी पणन मंडळ आराखडा तयार करत असून, थेट शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.  श्री. पवार म्हणाले, की महाराष्ट्र देशामध्ये फळे, भाजीपाला उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. महाराष्ट्रातून विविध राज्यांमध्ये शेतमाल पाठविला जातो. मात्र हा शेतमाल व्यापाऱ्यांद्वारा पाठविला जातो. यामध्ये शेतकऱ्यांना तुलनेत कमी दर मिळून व्यापारी अधिकचा नफा मिळवित असल्याचे वास्तव आहे. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांना परराज्यातील शेतमाल विपणनाच्या थेट संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पणन मंडळाने ९ राज्यांमध्ये व्यापार प्रतिनिधी पाठविले होते. या प्रतिनिधींनी प्रत्येक राज्यात एक महिना अभ्यास करून, त्याचा अहवाल पणन मंडळाला सादर केला आहे. या अहवालानुसार विविध राज्यांची विविध फळे आणि भाजीपाल्याची सध्याची गरज, दर, हंगाम, संबंधित राज्यातील व्यापाराच्या संधी याबाबची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार फळे, भाजीपालानिहाय प्रत्येक राज्याचा शेतमाल विपणन संधी आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये थेट शेतकऱ्यांना कशाप्रकारे सहभागी करून घेता येईल याबाबतचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, परराज्यात शेतमाल व्यापार संधी उपलब्ध होण्यासाठी पणन मंडळाने आंतरराज्य शेतमाल रस्ते आणि हवाई वाहतूक अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये शेतकरी गट, उत्पादक कंपन्याना वाहतूक खर्चाची ५० टक्के अनुदान दिले जात आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच शेतकरी गट, कंपन्यांना परराज्यातील शेतमालनिहाय व्यापार संधी नवीन अहवालानुसार उपलब्ध होणार आहे, असे पवार यांनी सांगितले.  शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे शक्य परराज्यांत थेट शेतमालाची थेट व्यापार संधी उपलब्ध करून देत असताना, व्यापारी, खरेदीदारांकडून होणारी फसवणूक टाळली जाणार आहे. पणन मंडळाने विविध राज्यांतील बाजार समित्या, पणन मंडळाद्वारे पीकनिहाय खरेदीदारांची माहिती संकलित केली आहे. या खरेदीदार आणि शेतकऱ्यांचा समन्वय साधत थेट व्यापार संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी संबंधित राज्याचे पणन मंडळ समन्वयक असणार असल्याने खरेदीदारांकडून शेतकऱ्याची होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे.  या राज्यांचा केला अभ्यास  राजस्थान, पंजाब, हरियाना, चंदिगड, दिल्ली, पश्‍चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू  या शेतमालाला आहेत संधी  कांदा, बटाटा, डाळिंब, द्राक्ष, पपई, संत्रा, आंबा, केळी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com