जळगाव : जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन यंदा वाढले असून, तापी व गिरणा काठालगतचे अनेक शेतकऱ्यांचा याकडे कल आहे. यातच कांदा बीजोत्पादनासाठी आवश्यक बल्ब (बियाण्यासाठीचा कांदा) शेतकऱ्यांना नाफेडकडून कमी दरात मिळावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी कांदा बीजोत्पादनातून एकरी साडेतीन क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ लागले आहेत. जिल्ह्यात सुमारे दीड हजार हेक्टरपर्यंत कांदा बीजोत्पादन वाढले आहे. तापी व गिरणा काठालगत मधमाश्या व वृक्षराजी बऱ्यापैकी आहे. मधमाश्यांसाठी व कांदा बीजोत्पादनासाठी अनुकूल वातावरण असल्याने उत्पादन बऱ्यापैकी येऊ लागले आहे. उत्पादनाचा टक्के हळूहळू वाढल्याने काही शेतकरी मागील तीन वर्षांपासून त्याचे उत्पादन घेत आहेत
.
काही लहान कांदा बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांशी हमीभावाने करार केले आहेत. ५०० रुपये प्रतिकिलो या दरात खरेदीचे करारही काही भागांत झाले असून, यंदा विदगाव, खापरखेडा, आवार भागात कांदा बीजोत्पादकांची संख्या वाढल्याची माहिती आहे.
कांदा बीजोत्पादनासाठी पट पद्धतीने सिंचनाऐवजी ठिबकद्वारे सिंचन करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. हव्या त्या वेळी, हवे तेवढे पाणी देता येणे शक्य असल्याने शेतकरी ठिबक यंत्रणेकडे वळल्याची माहिती मिळाली.