नवी दिल्ली ः खरिपातील भात, मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, कापूस अाणि उडीद अादी प्रमुख पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री होत अाहे. यामुळे गेल्या दोन अाठवड्यांत देशभरातील शेतकऱ्यांचे ६२.८ अब्ज रुपयांचे नुकसान झाले अाहे, असा दावा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केला अाहे.
शेतमालाचा निश्चित केलेला हमीभाव अाणि प्रत्यक्षात होत असलेल्या विक्रीदरात मोठी तफावत अाहे, असे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी जाहीर केलेल्या अाकडेवारीवरून दिसून अाले अाहे. शेतमालाची अशाचप्रकारे कमी दराने विक्री होत राहिल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अाकडा ३५९.७ अब्ज रुपयांवर पोचणार अाहे, असेही किसान संघर्ष समितीने म्हटले अाहे.
गेल्या वर्षी देशात बंपर पीक उत्पादन झाले. यामुळे धान्यसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला. त्यात यंदाच्या खरिपातील शेतमालाची अावक वाढली अाहे. प्रमुख शेतमालांचे दर घसरले असल्याचे चित्र दिसत अाहे. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत अाहे.