बीड : यंदा पाऊस बरा हायं म्हणतात. पण काय खरं.... एका दिवसात चित्र बदलतं. तसे आजवर लई अनुभव आलेत, म्हणून जोवर मॉन्सून सक्रिय व्हत नाही, तोवर काहीच नाही. कपाशीत नुकसान झाल्यानं त्याचं क्षेत्र घटणारं एवढ मात्र नक्की. पडलेल्या दरामुळे अर्थकारण कोलडमलेले असलं तरी पेरणी ही करावीच लागणार, त्यासाठीची जुळवाजुळव पावसाची निश्चिती झाली की जोमानं करू. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा संवाद येत्या खरिपाच्या तयारीचं गणित मांडण्यास पुरेसा आहे.
बीड जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. चांगल्या मॉन्सुनचा अंदाज व्यक्त केला गेला असला तरी पावसाचे दमदार आगमन व त्याची शाश्वत सक्रियता दिसल्याशिवाय यंदा शेतकरी बियाण्याची निवड व रासायनिक खताची खरेदी करतील असं चित्र नाही.
जिल्ह्याचं खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ६४ हजार हेक्टर आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, तीळ, सुर्यफूल, सोयाबीन, भूईमुग, कपाशी ही खरिपातील प्रमुख पिकं. गतवर्षीच्या खरिपात बोंड अळीच्या प्रादुर्भाव झाल्याचा अनुभव असल्याने यंदा पाउस चांगला झाला, तर १५ जूनच्या आसपासच कपाशीची लागवड होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कपाशीचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ३० हजार हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अर्थात शेतकऱ्यांशी झालेल्या संवादातून पुढे आलेला निष्कर्षही अंदाजाच्या दिशेनेच आहे. कपाशीच्या क्षेत्राची घट सोयाबीनच्या पर्यायातून शेतकरी भरून काढण्याच्या मानसिकतेत असून, काही शेतकरी कमी कालावधीच्या पिकातूनही कपाशीला पर्याय शोधण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
२०१७-१८ मध्ये खरिपाची सर्वसाधारण क्षेत्रापैकी ७ लाख ५४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रात घट वाढ प्रस्तावित करण्यात आली असली तरी बीड जिल्ह्याच्या खरीप क्षेत्रात मात्र गतवर्षीच्या क्षेत्राच्या तुलनेत वाढ किंवा घट प्रस्तावित करण्यात आली नाही.
येत्या खरिपात जिल्ह्यात ७ लाख ५५ हजार हेक्टरवर खरीप पेरणी अपेक्षित आहे. त्यासाठी ६१ हजार ४६४ क्विटंल बियाणांची गरज भासणार आहे. तशी मागणी करण्यात आली आहे. मागणीच्या तुलनेत जवळपास ४२ हजार १७९ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. बियाणांचा पुरवठा झाला असला तरी शेतकऱ्यांनी अजून बियाणांची उचल केली नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील सूत्रांनी दिली.
बीड जिल्ह्यात २ लाख ६० हजार ७५८ टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली होती. गतवर्षीचा ३८ हजार ६४६ टन खतसाठा उपलब्ध होता. विभागाने १ लाख ४२ हजार ८०० टन खताचे आवंटन दिले. त्या तुलनेत मे २०१८ मध्ये जिल्ह्यासाठी ४३,५८० टन खताचे आवंटन मंजूर झाले. मंजूर आवंटनापैकी १९,६६० टन खताचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात ५८ हजार ३०६ टन रासायनिक खते उपलब्ध होण्यास मदत झाली.