हिंगोली ः कर्जामाफीचा घोळ अद्याप सुरूच आहे. पीककर्ज देण्यासाठी बॅंकांकडून चालढकल केली जात आहे. तुरीचे थोडेबहुत पैसे मिळाले असले तरी हरभऱ्याचे चुकारे अजून रखडलेलेच आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा रोखीवर भर आहे. त्यामुळे उधारीवर निविष्ठा मिळणे कठीण झाले आहे. पेरणीची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. नैसर्गिक आपत्ती, कोसळलेले बाजारभाव, बाजार यंत्रणा यांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी भांडवल उपलब्ध नाही.
त्यामुळे ऐनवेळी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा दराने रिन (कर्ज) काढून पेरणी करावी लागणार आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ५६ हजार ३९५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गतवर्षीपेक्षा यंदा कापूस लागवड क्षेत्रात ११ हजार २२ हेक्टरने (२० टक्के) घट होऊन ४३ हजार ६८४ हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात २५०० हेक्टरने वाढ होऊन यंदा २ लाख ३० हजार ५१८ हेक्टरवर, तुरीची ४६ हजार ९९७, मुगाची १२ हजार ४७२, उडदाची ८ हजार ९२, ज्वारीची १० हजार २६, मक्याची २६२३, तीळाची २३१ हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे.
वाढलेला उत्पादन खर्च, वेचणीसाठी मजुरांची समस्या बोंड अळीचा प्राद्रुर्भाव यामुळे कपाशीच्या क्षेत्रात मोठी घट तर सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात वाढ होईल. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या हळदीच्या क्षेत्रात यंदा २० ते ३० टक्के वाढ होईल, असे सांगितले जात
आहे.
सध्या जिल्ह्यातील शेतकरी हरभऱ्याच्या मोजमापासाठी केंद्रावर, पीककर्जासाठी बॅंकेत चकरा मारत आहेत. पेरणीपूर्व वखर पाळ्या, काडीकचरा वेचणे, शेणखत नेऊन टाकणे, हळद लागवडीसाठी बेड तयार करत असल्याचे चित्र जिल्ह्यातील गाव शिवारात दिसत आहे.
‘महाबीज’ आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे मिळून एकूण १ लाख १० हजार ८७४.९७ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ६६ हजार १२६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. बीटी कपाशीची ३३ हजार २२० पाकिटेदेखील उपलब्ध झाली आहेत. खरीप हंगामासाठी विविध ग्रेडच्या ५८ हजार
१२० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर झाला आहे. गतवर्षीचा १५ हजार ७९१ टन खतसाठा शिल्लक आहे.