यंदाही सोयाबीनशिवाय पर्याय नाही

खरिपातील मशागतीची कामे सुरू झाली आहे. पाऊस झाल्यावर बियाणे व खते खरेदी करणार आहे. खरिपात दुष्काळी तालुक्यात कांदा, मका व थोड्या प्रमाणात सोयाबीनची लागवड होईल. - धनाजी जाधव, आदर्की, ता. फलटण, जि. सातारा.
खरीप नियोजन
खरीप नियोजन
सातारा ः जिल्ह्याच्या अनेक भागात वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व कामांना प्रारंभ केला आहे. हंगामासाठी आवश्यक खते उपलब्ध झाली असून, टप्पाटप्प्याने बियाणेदेखील बाजारात येऊ लागले आहे. पीककर्ज वितरण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने आघाडी घेतली असून, एप्रिलअखेर २६ टक्के पीककर्ज वितरण झाले आहे. या हंगामातदेखील सोयाबीनची सर्वाधिक पेरणी होण्याचा अंदाज असून, या पिकाशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी सांगतात.
 
जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस झाल्याने काही प्रमाणात पाणीटंचाई कमी झाली आहे. सातारा, जावली, महाबळेश्र्वर, कऱ्हाड, पाटण, वाई या तालुक्यांचा खरीप तर माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांचा रब्बी हा प्रमुख हंगाम असतो. मात्र असे असले तरी दोन्हीही हंगामात सर्वच तालुक्यांत विविध पिकांची लागवड केली जाते.
 
कृषी विभागाने खरिपासाठी तीन लाख ८० हजार हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र निश्चित केले आहे. या क्षेत्राच्या आधारे एक लाख नऊ हजार टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे. मागील हंगामातील व या हंगामातील मिळून सध्या बाजारात ६६ हजार टन रासायनिक खत उपलब्ध आहे.
 
तसेच ४८ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली असून, सध्या २४ हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या बियाण्यात सोयाबीन, भात, ज्वारी, तूर, मूग आदी पिकांचा समावेश आहे. 
 
जिल्ह्यात मागील सहा ते सात वर्षांपासून खरिपात शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल वाढल्याने या पिकांची सर्वाधिक पेरणी होत आहे. मागील खरिपात सोयाबीनचे दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीनची विक्री करावी लागली आहे. पणन विभागाकडून खरेदी केंद्र सुरू करून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी खरेदी केंद्रास मर्यादा असल्याने ३० ते ४० टक्के सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली आहे.
 
खरीप ज्वारी व भाताचे क्षेत्र दिवसेंदिवस घटू लागले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून या दोन पिकांची सर्वसाधारण क्षेत्राइतकीही पेरणी झालेली नाही. दुष्काळी भागातही सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनच्या दरातील संकट दिसत असले तरी खरिपात सणाच्या तोंडावर तसेच कमी जास्त पाऊस झाला तरी नुकसान कमी होणारे पिक असल्यामुळे यादेखील खरिपात 
सोयाबीनला पर्याय नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

खरीप हंगामासाठी एप्रिल महिन्यापासून कर्ज वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खरिपासाठी १६८० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप उद्दिष्ट सर्व बँकानी ठेवले आहे. यापैकी एप्रिलअखेर ४३७ कोटी २३ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ४१० कोटी ७८ लाख म्हणजेच उद्दिष्टाच्या ५१ टक्के कर्ज वितरण केले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकानी मात्र कर्ज वितरणात हात अखडता घेतला आहे. २१ राष्ट्रीयीकृत बँकानी अवघे २० कोटी ४९ लाख म्हणजेच उद्दिष्टांच्या अवघे तीन टक्के कर्ज वितरण केले आहे. या बँकाच्या अनास्थेमुळे शेतकरी पीककर्जापासून वंचित रहाण्याची शक्यता आहे.  

जिल्ह्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस झाला आहे. हा पाऊस अपेक्षित प्रमाणात झाला नसला तरी खरीप कामे सुरू करण्याइतपत पाऊस झाला आहे. सध्या जमीन नांगरटीसह विविध प्रकारची कामे शिवारात सुरू झाली आहेत. तसेच शेणखत टाकण्याची कामेदेखील केली जात आहे. पेरणी व टोकणीयोग्य जमीन तयार करून ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

मॅान्सूनने दमदार हजेरी लावल्यावर बियाणे व खते खरेदी केली जाणार असल्याने सध्या निविष्ठा खरेदीचे प्रमाण कमी आहे. भात रोपवाटिकेसाठी जमीन तयार करण्याची कामे सुरू झाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com