हुंकार मुंबईच्या वेशीवर

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला नाशिक ते मुंबई हजारो शेतकऱ्यांचा लाँगमार्च शनिवारी (ता.१०) ठाणे जिल्ह्यात पोचला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला नाशिक ते मुंबई हजारो शेतकऱ्यांचा लाँगमार्च शनिवारी (ता.१०) ठाणे जिल्ह्यात पोचला.

भिवंडी/मुंबई : कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट भाव द्या, आदी मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा निघालेला शेतकऱ्यांचा लाँगमार्च आता मुंबईच्या वेशीवर भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावात पोचला. किसान सभेच्या नेतृत्वाखालील हे मोर्चेकरी उद्या (ता. १२) विधान भवनाला बेमुदत घेराव घालणार आहेत.  सोनाळे येथे दाखल झाल्यानंतर तळपत्या उन्हामुळे लाँगमार्चमधील ५० ते ६० मोर्चेकरी उष्माघाताने भोवळ येऊन पडल्याने येथे थोडा वेळ विश्रांती घेऊन दुपारी ४ वाजता मोर्चा मुंबईकडे रवाना झाला. ‘‘सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. मात्र १० ते १५ टक्के सुध्दा कर्जमाफी झाली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मोर्चेकरी मुंबई जाम करतील,’’ असा इशारा डाॅ. अजित नवले यांनी दिला.  दरम्यान, शनिवारी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच शिवसेनेपाठोपाठ शनिवारी मनसेनेही पाठिंबा जाहीर केला आहे.   स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतीसाठी द्या.  बोंड अळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई द्या, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा, साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा, विकासकामांच्या कारणाने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा, या प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च व बेमुदत घेराव घालण्यात येणार आहे.  हजारोंचा सहभाग असलेला शेतकऱ्यांचा हा लाँग मार्च नाशिकहून गेल्या मंगळवारी निघाला. तो आता मुंबईच्या वेशीवर पोचला आहे. हा मोर्चा १२ मार्च रोजी मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. या वेळी शेतकरी विधानभवनाला बेमुदत घेराव घालणार आहेत. शेतकऱ्यांच्या या मोर्चाला अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने याआधी पाठिंबा जाहीर केला होता. शुक्रवारी शहापूर येथील वालकस फाटा येथे लाँगमार्च मुक्कामी होता. या वेळी ‘‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शहापूर येथे जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,’’ अशी ग्वाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या वेळी राज्य मंत्री दादाजी भुसे त्यांच्यासमवेत उपस्थित होते. आता मनसेनेही पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चाला पाठिंबा असल्याचे फोनवरून सांगितले आहे, अशी माहिती किसान सभेचे सचिव अजित नवले यांनी दिली. मनसेचे कार्यकर्ते ठाणे आणि मुंबईत मोर्चातील शेतकऱ्यांचे जंगी स्वागत करतील. ठाणे आणि मुंबईकरांनीही शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. लाँगमार्चचा मुक्काम ठाण्यात होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com