देशव्यापी शेतकरी संपादरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान हा गैरसमज

देशव्यापी शेतकरी संपादरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान हा गैरसमज
देशव्यापी शेतकरी संपादरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान हा गैरसमज

नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने देशभरातील ११० विविध शेतकरी संघटना एकत्रित येऊन १ ते १० जून दरम्यान देशव्यापी शेतकरी संप पुकारला आहे. या संपात शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते, अशा प्रकारे काही मंडळी गैरसमज पसरवित आहेत. याबाबत राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने राज्यातील कोअर कमिटीचे सदस्य शंकर दरेकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.  श्री. दरेकर म्हणाले, की शेतकरी संपा दरम्यान देशभर १२८ निवडक शहरांचा दूध व भाजीपाला पुरवठा बंद केला जाणार आहे, मुळात सद्याचे सरकार केवळ शहरी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन विविध धोरणे राबवित आहे व याचा फटका शेती व्यवसायावर मोठ्या प्रमाणात बसला आहे. यासाठी फक्त शहरांचा पुरवठा बंद करून उर्वरित भागात शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे. दरेकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर या शहरांचा समावेश असून, या शहरांमध्ये देखील मोठ्या मैदानावर शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतकरी ठरवेल त्याच भावात विक्री करता येणार आहे. गतवर्षी या शेतकरी संपादरम्यान काही व्यापारी मंडळींनी याचा गैरफायदा घेऊन चढ्या दराने भाजीपाला विकल्याचे निदर्शनास आले आहे; मात्र यावर्षी शेतकरी थेट दर ठरविणार असल्यामुळे शेतकऱ्यांना उलट जास्त फायदा होणार आहे. नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानावर अशी व्यवस्था करण्याचे नियोजन असून या मैदानावर शेतकऱ्यांना थेट दूध विक्रीदेखील करता येणार आहे; मात्र यासाठी दूध संघ व दूध डेअरी यांना येथे विक्री करता येणार नाही. नाशिकमध्ये दुधाचा दर महासंघाने ६० रुपये लिटर इतका ठेवला असून यामुळे शेतकरी फायद्यात येणार आहे.’’  गतवर्षी राज्यव्यापी शेतकरी संप करताना कर्जमाफी, हमीभाव, दूध दर अशा मागण्या ठेवल्या होत्या मात्र कर्जमाफी वगळता इतर निर्णय केंद्र सरकारच्या हातात असल्यामुळे या वेळी देशव्यापी शेतकरी संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय राज्यातील शेतकरी प्रतिनिधींनी एकत्रित रित्या ११ एप्रिल रोजी पुण्यातील बैठकीमध्ये घेतला आहे.  या बैठकीत ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील कोअर कमिटी काम करेल व डॉ. मुळीक यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही असे एकमताने ठरले आहे. या आंदोलनाला देशभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून सद्यस्थितीत २२ राज्यांतील विविध संघटना देशव्यापी शेतकरी संपासाठी एकवटलेल्या आहेत, राज्यातदेखील १५ पेक्षा जास्त जिल्ह्यात या शेतकरी संपाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय किसान महासंघाची स्थापना जानेवारी २०१७ मध्ये झाली असून आजपर्यंत राष्ट्रीय पातळीवर ६ आंदोलने यशस्वी पणे केली आहेत. देशव्यापी शेतकरी संपातील मागण्या

  •  शेती व शेतीपूरक व्यवसाय यांना सरसकट सातबारा कोरा अशीच कर्जमाफी
  •  उत्पादन खर्च+५०% हमीभाव
  •  शेती व शेतीपूरक व्यवसाय यांना मोफत वीज
  •  संरक्षित शेती उत्पन्न कायदा (इर्मा) कायद्याची अंमलबजावणी
  •  दुधाला कमीत कमी ५० रुपये स्थिर भाव
  •  बैलगाडा शर्यत व तत्सम स्पर्धांना कायदेशीर मान्यता  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com