शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्यांचाही सहभाग

पणन मंडळाने अतिशय चांगला निर्णय घेतलेला असून, चार ते पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या योजनेअंतर्गत मुगाचे संकलनही सुरू केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुलभ आहे. व्याजदरही सहा टक्के एवढा आहे. सध्या या योजनेत सहभागी असलेल्या कंपन्यांचे अनुभव पाहून ही योजना आणखी व्यापक स्तरावर राबवली जाईल, असा विश्वास वाटतो. - योगेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी (महाएफपीसी)
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार समित्यांबरोबरच आता शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फतही (एफपीसी) राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजाणीत बाजार समित्यांची कामगिरी असमाधानकारक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पणन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या कंपन्यांना पणन मंडळाच्या वतीने कर्जपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

शेतीमालाचे भाव बाजारात पडले तर कमी किमतीत शेतीमाल विकून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्यात शेतीमाल तारण योजना राबवली जाते. त्यानुसार शेतीमाल गोदामांत तारण ठेऊन त्यावर शेतकऱ्यांना शेतीमालाच्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज दिले जाते. शेतीमालाचे दर सुधारल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारात हा माल विकणे अभिप्रेत असते. सध्या ही योजना बाजार समित्यांमार्फत राबविण्याचे धोरण आहे. परंतु अपवाद वगळता बाजार समित्यांनी ही योजना राबविण्यास उदासीनता दाखविल्याने या योजनेचा हेतू असफल होताना दिसत आहे. ही योजना न राबविणाऱ्या बाजार समित्या बरखास्त करण्याचे आदेशही पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी नुकतेच दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर पणन मंडळाने शेतकरी उत्पादक कंपन्यांना या योजनेत सामावून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार काही कंपन्यांनी कामही सुरू केले आहे. राज्यात कृषी व्यवस्थापन तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) माध्यमातून सुमारे १३४६ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. प्रत्येक कंपनीशी सरासरी ४०० शेतकरी जोडले गेले आहेत.

आत्मा व कृषी विभागातील अंतर्गत संघर्षामुळे  सध्या या कंपन्यांकडे कोणाचेच फारसे लक्ष नाही. या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे भांडवल गुंतले आहे. तसेच अनेक कंपन्या निष्क्रिय असून, त्यांचे अस्तित्व कागदावरच आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना नवी संधी निर्माण झाली आहे, असे मत सूत्रांनी व्यक्त केले.  

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तातडीने कृषी पणन मंडळाची संपर्क साधून ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी सांगितले.

अशी असेल कार्यपद्धती शेतकरी उत्पादक कंपन्या बाजारभावानुसार शेतकऱ्यांकडून शेतीमाल घेतील. कंपन्यांकडून शेतीमालाच्या बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्जरूपात देण्यात येईल. शेतीमालाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (हमीभाव) वर गेल्यास शेतकरी शेतीमाल विकू शकतील. विक्री केलेल्या रकमेतून कर्ज, व्याजाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम संबधित शेतकऱ्यांच्या नावावर जमा होईल.

या आहेत अटी

  • शेतकरी कंपनी दोन वर्षांपूर्वी रजिस्टर असावी.
  • कंपनीकडे स्वमालकीचे गोदाम असावे.
  •  गोदाम असणाऱ्या कंपनीने कृषी पणन मंडळाची पूर्वमंजुरी व तारण मर्यादा मंजूर करून घेणे आवश्‍यक.
  • शेतीमाल तारण योजना निधी हा बाजारनिधी असल्याने कंपन्यांना ६ टक्के व्याजदर आकारण्यात येणार.
  • एका शेतकरी उत्पादक कंपनीस जास्तीत जास्त २५ लाख रुपये तारण कर्ज मिळू शकेल.
  • बाजार समित्यांसाठी असणाऱ्या सर्व तरतुदी शेतकरी उत्पादक कंपन्याला लागू होतील.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com