अकोला : कमी पाऊस झाल्याचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो हे सध्या पातूर तालुक्यातील शेतकरी अनुभवत अाहेत. या तालुक्यातील कोठारी गावात पाणीच नसल्याने फळबागा टँकरच्या पाण्यावर जगविण्याची धडपड शेतकरी करीत अाहेत.
पातूर तालुक्यातील मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी गावात सुमारे ७० हेक्टरवर संत्रा लागवड अाहे. याशिवाय काही शेतकऱ्यांनी मोसंबी, पेरूची लागवड केली अाहे. दरवर्षी या गावातून सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक रकमेचा संत्रा बंगळूर, गुजरात, मुंबईसह स्थानिक बाजारात विकला जातो. अाज या संत्र्याच्या बागा टॅंकरच्या पाण्यावर जगविण्याची धडपड शेतकरी करू लागले अाहेत.
कुणी टँकरने पाणी अाणून देत अाहे, तर कुणी दिवसभरात १५ ते २० मिनिटे मिळणाऱ्या उपशाचे पाणी बागेला देत अाहे.
दररोज उन्हाची तीव्रता वाढत अाहे. पारा ४० अंशावर पोचला असून, पाण्याची गरज वाढत अाहे. कोठारी गाव मोर्णा धरणाच्या पायथ्याशी अाहे. या गावात आजवर जलसंपन्नता असल्याने फळबागांचा मोठा विस्तार झाला. एकाच गावात ७० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर संत्रा व इतर फळबागा उभ्या राहिल्या. संत्रा बागांमधून मागील अनेक हंगामात शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळाले.
या वर्षात कमी पाऊस झाल्याने अाधीच संत्र्याचा बहार फुटला नव्हता. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. ज्यांच्या बागेत बहार धरला त्यात अाता फळगळ होत अाहे. वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याची गरज भागवणे शेतकऱ्यांना हाताबाहेर गेले अाहे. या परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून, दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत चालले अाहे.
कोठारी या गावाच्या दक्षिणेस अवघ्या चार किलोमीटर अंतरावर मोर्णा धरण आहे. या धरणातील पाणी संत्राबागा जगविण्यासाठी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे केली अाहे.