पुणे जिल्ह्यातील विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त

मी मका, कलिंगड, टोमॅटो पिके घेतली आहे. महावितरणाकडून तीन दिवस दिवसा, तीन दिवस रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी येतात. शासन नुसत्याच घोषणा करते पण शेतकऱ्यांना आठ ताससुद्धा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करीत नाही. - रघुनाथ शिंदे, शेतकरी, खैरेनगर, शिरूर, जि. पुणे.
पिके सुकु लागली
पिके सुकु लागली
पुणे  ः उन्हाचा चटका वाढल्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली आहे. ऐन उन्हाळ्यात ग्रामीण भागात महावितरणकडून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे उभी पिके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहेत. सध्या विजेच्या लपंडावामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले असून, पूर्ण दाबाने वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
शेतीसाठी बारा तास वीजपुरवठा करण्याच्या घोषणा शासनाकडून केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र या घोषणा हवेतच विरत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज बाराऐवजी फक्त आठ तासच दिली जात असल्याचे कागदोपत्री दिसून येते. प्रत्यक्षात या आठ तासांमध्ये विजेचा चांगलाच लपंडाव सुरू असतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षे दुष्काळामुळे शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आले होते. मात्र, गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस, टोमॅटो, डाळींब, भाजीपाला आदी पिके घेतली आहे.  
यंदा उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी बाजरी, मका, भूईमूग आदी पिकांची लागवड केली आहे. याशिवाय ऊस, टोमॅटो, कलिंगड, डाळिंब, सिताफळ यांसह भाजीपाला पिके घेतली आहे. परंतु शहरातील नागरिकांकडून मागणी वाढली असल्याने ग्रामीण भागात शेतीसाठी कमी दाबाने पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतीसाठी काही भागांत अवघे चार ते पाच तासच वीजपुरवठा केला जात आहे.
त्यामुळे इंदापूर, बारामती, शिरूर, खेड, इंदापूर, भोर, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील काही भागांत पिके सुकत असल्याचे चित्र आहे. याविषयी इंदापूर येथील लक्ष्मण संगवे म्हणाले, की माझ्याकडे एकूण पाच एकर शेती आहे. त्यामध्ये तीन एकरावर डाळिंब, ऊस अर्धा एकर आहे. गव्हाची काढणी झाली आहे. महावितरण विभागाने आमच्याकडे आठ तासांचे वेळापत्रक दिले आहे. परंतु आठ तास वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे वीजपंप चालत नसून पिकांना पाणी देण्याचे नियोजन कोलमडत आहे. महावितरणने पूर्ण दाबाने शेतीसाठी वीजपुरवठा करावा अशी आमची मागणी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com