जळगाव ः ऑक्टोबरमधील कडक उन्हामुळे जिल्ह्यातील पिकांना सिंचनाची गरज आहे; पण अशातच भारनियमन मध्येच खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
जिल्ह्यात मागील आठ ते १० दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत आहे. केळी, कपाशी, तूर पिकाला सिंचनाची गरज आहे; पण वीज व्यवस्थित नसते. वीजपुरवठा मध्येच खंडित होतो, त्याचा फटका वीजपंपांना बसतो. धरणगाव, एरंडोल, जळगाव या तालुक्यात सोमवार ते गुरुवार असे चार दिवस दिवसा सकाळी १० ते ५ व शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दोन वाजेपासून ते सकाळी १० वाजेपर्यंत वीजपुरवठा केला जातो.
ज्या वेळेस कृषिपंपांना दिवसा वीज दिली जाते त्या काळात महावितरणतर्फे वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण केले जातात. मध्येच कुठलेतरी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद असतो. या काळात पंप बंद राहत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. रात्री वीजपुरवठा असतो, त्या काळात शेतकऱ्यांना मध्यरात्रीनंतरही जागे राहावे लागते. यातच मध्येच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पुन्हा कृषिपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्वीच (स्वयंचलित) यंत्रणा बसवून घेतली आहे. त्यासाठी त्यांना एक हजार रुपये व त्यापेक्षा अधिक खर्च आला आहे.
महावितरणने दुरुस्तीची कामे कृषिपंपांना वीजपुरवठा सुरू नसताना केली तर या काळात सिंचनाचे काम सुरळीत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.