ऊसदराबाबत शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम
ऊसदराबाबत शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम

सोलापूरात ऊसदराबाबत संघटना आंदोलनावर ठाम

पंढरपूर, जि. सोलापूर  ः ऊसदर आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर साखर कारखानदार, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठक झाली. बैठकीसाठी कारखानदारांनी पाठवेल्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कायम ठेवली आहे.  गेल्या आठ दिवसांपासून स्वाभिमानी, बळिराजा, रयत आदींसह इतर विविध शेतकरी संघटनांनी जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी या वर्षीच्या उसाला पहिली उचल तीन हजार ४०० रुपये जाहीर करा; मगच कारखाने सुरू करा, असा इशारा दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी स्वतःहून तोडी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही साखर कारखानदारांनी ऊसतोडी सुरू करून संघटनांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातूनच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार सुरू झाले आहेत. दुसरीकडे पंढरपूर तालुक्‍यातील काही कारखानदार बळाचा वापर करून ऊसतोडी सुरू करत असल्याने संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपासून भीमा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आंदोलनाने पुन्हा जोर धरला आहे. आंदोलनादरम्यान तालुक्‍यात कुठेही अनुचित किंवा हिंसक प्रकार घडू नयेत, यासाठी आज येथील पंचायत समितीच्या सभागृहात सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.  बैठकीमध्ये सुरवातीला श्री. पिंगळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हिंसक आंदोलन न करता सनदशीर मार्गाने आंदोलन करा. कायदा हातात घेऊन जर कोणी आंदोलन करत असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी मंत्री समितीच्या बैठकीत जो निर्णय होईल त्यानुसार दर जाहीर केला जाईल, असे सांगितले. त्यावर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी लावून धरली; मात्र दर जाहीर करण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.    बैठकीसाठी विठ्ठल कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे शेती अधिकारी संभाजी थिटे, पांडुरंगचे कारखान्याचे रमेश गाजरे, वसंतराव काळे कारखान्याचे श्री. काझी, शहर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, तालुका पोलिस निरीक्षक कृष्णकांत खराडे, रयत शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक भोसले, बळिराजाचे जिल्हा अध्यक्ष माउली हळणवर, माउली जवळेकर, शहाजन शेख, स्वाभिमानीचे नवनाथ माने, विजय रणदिवे, तानाजी बागल, महिला आघाडीप्रमुख विश्रांती भुसनर, मेजर महादेव नागटिळक आदींस पदाधिकारी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com