विदर्भात कसुरी मेथी लागवडीचा प्रयोग

कसुरी मेथी
कसुरी मेथी

नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाच्या बळावर अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्‍यात सुमारे ३० गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर कसुरी मेथी लागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला विभागाचे प्रमुख डॉ. श्याम घावडे यांचे मार्गदर्शन या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना मिळत आहे. विदर्भात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे.

कसुरी मेथी (Trigonella conriculata L.) हे पीक बिहार व राजस्थानच्या उत्तरी भागात घेतले जाते. या पिकाकरिता थंड हवामानाची गरज भासते. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये (रब्बी हंगामात) याची लागवड होते. मसालावर्गीय पिकात मसाले बियाणे पीक म्हणून याचा अंतर्भाव होतो. राष्ट्रीय स्तरावर "पुसा कसुरी'' हे वाण यापूर्वी प्रसारित झाले असून, याशिवाय इतर वाण विशेष प्रसिद्ध नाहीत. याच्या पानाला विशिष्ट सुगंध असल्याने मसाला व मांसाहारी भाज्यांमध्ये याच्या वाळलेल्या पानाचा  उपयोग केला जातो.

साध्या मेथीपेक्षा याचे बियाणे लहान आकाराचे राहते. एकरी ४०० ते ५०० ग्रॅम बियाण्यांची गरज भासते. कसुरी मेथीला मागणी आहे. खासगी मसाले कंपन्या सध्या याचे ब्रॅंडिंग करतात. त्यानुसार २५ ग्रॅमच्या पाकिटाला २० रुपये मोजावे लागतात. शेतकऱ्यांनादेखील हे पीक चांगला फायदा मिळवून देऊ शकते, ही बाब लक्षात घेत कृषी विद्यापीठाने संशोधनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. दोन ओळींतील अंतर, बियाणे आणि काढणीपश्‍चात प्रक्रिया या विषयीची माहिती विद्यापीठ शेतकऱ्यांना देईल. सध्या विद्यापीठ प्रक्षेत्रावर याचे प्रयोग घेण्यात आले. त्यानुसार वाळलेल्या पानाचे एकरी ६ क्‍विंटल उत्पादन मिळाले होते. शेतकऱ्यांनी केली लागवड मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्‍यातील अरुण बोंडे यांनी सात गुंठे, राजू वानखडे तसेच कृषी अधिकारी लहाने यांच्यासह काही शेतकऱ्यांनी थोड्याथोड्या क्षेत्रावर हे पीक लावले आहे. सुमारे ३० गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्र या पिकाखाली आहे. बीजोत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांद्वारे प्रस्तावित असून, प्रक्रिया करून कसुरी मेथी विकण्याचे प्रस्तावित आहे. चक्रपाणी बचत गटाच्या माध्यमातून लवकरच पॅकिंग करून ते विकले जाईल. अशी करावी लागते प्रक्रिया कसुरी मेथी कडवट असल्याने साध्या मेथीप्रमाणे थेट खाता येत नाही. हिरवी पाने तोडून उकळत्या पाण्यामध्ये १ ते २ मिनिटे सोडली जातात. नंतर पाण्यातून काढत ती सावलीत दोन ते तीन दिवस वाळविली जातात. वाळलेल्या पानांचा हिरवा रंग कायम राहणे गरजेचे राहते. अशा पानांना बाजारात मागणी राहते, असे डॉ. श्याम घावडे यांनी सांगितले. या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या व्यवसायिक पिकाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com