परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ५ लाख ५६ हजार ४६० शेतकऱ्यांपैकी जानेवारी अखेरपर्यंत २ लाख ८७ हजार २९१ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. अद्याप या तीनही जिल्ह्यांतील २ लाख ६९ हजार १६९ शेतकरी कर्जमाफीच्या ‘वेटिंग लिस्ट’वर आहेत.
कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना अर्जातील त्रुटींच्या पूर्ततेसाठी संबंधित बॅंक, तसेच तालुकास्तरीय समितीकडे कर्जमाफीसाठी पात्र असल्याची माहिती सादर करावी लागणार आहे. त्यादृष्टीने बॅंकांनी अर्जात त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सूचना फलकावर लावणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी नांदेड जिल्ह्यातील २ लाख ६ हजार १३५ शेतकऱ्यांनी, परभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकऱ्यांनी, हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ३८५ शेतकऱ्यांनी असे तीन जिल्ह्यांतील एकूण ५ लाख ५६ हजार ४६० शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. जानेवारी अखेरपर्यंत नांदेड जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ६३९ शेतकऱ्यांना ६६९ कोटी ८९ लाख रुपये, परभणी जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४२४ शेतकऱ्यांना ६८२ कोटी २९ लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यातील ३७ हजार २२८ शेतकऱ्यांना १२० कोटी ५३ लाख रुपये, असे तीन जिल्ह्यांतील २ लाख ८७ लाख २९१ शेतकऱ्यांना १४७२ कोटी ७१ लाख रुपये एवढ्या रकमेची कर्जमाफी मिळाली आहे.
परंतु अर्जातील त्रुटीमुळे नांदेड जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ४९६ शेतकरी, परभणी जिल्ह्यातील ५५ हजार ५१६ शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातील ७२ हजार १५७ शेतकरी असे तीन जिल्ह्यांतील एकूण २ लाख ६९ हजार १६९ शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या ‘वेटिंग लिस्ट’वर आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्जामध्ये भरलेली माहिती आणि बॅंकांकडील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती जुळत नाही. विशेषतः कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जामधील माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये माहिती अपुरी सादर केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.
शेतकऱ्यांच्या अर्जातील माहिती आणि बँकेकडील असलेल्या माहितीच्या आधारे शहानिशा करून कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची पात्रता, अपात्रता निश्चित करण्याची तालुका सहायक निबंधक अध्यक्ष असलेल्या तालुकास्तरीय समितीकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र असल्याबाबतची माहिती या समितीकडे सादर करावी लागणार आहे. अनेक बॅंकांनी अर्जामध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सूचना फलकावर लावलेल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र अपात्रेबाबतची माहिती मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.