सांगली : दुष्काळी भागाला वरदान ठरणारी टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे. याचा लाभ खानापूर, आटपाडी, कवठेमहंकाळ, तासगाव तालुक्यांना होतोय. मात्र कवठेमहंकाळ तालुक्यात या योजनेचे पाणी येण्यास अजून २० ते २५ दिवसांहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
टेंभू उपसा सिंचन योजना सुरू होण्यास आधीच उशीर झाला आहे. त्यामुळे कवठे महांकाळ तालुक्यातील सुमारे १२०० हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. पावसाळ्यात जरी पाऊस चांगला झाला असला तरी भूजल पातळी खालावली आहे.
योजना सुरू करण्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे योजना सुरू झाली आहे. मात्र या तालुक्यातील नागज, आरेवाडी, नागोळाचा पूर्व भाग या भागातील सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. टेंभूचे पाणी आल्यानंतर तलाव भरून द्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
पावसावर रब्बी हंगामातील शाळू पिकाची पेरणी केली. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पिकाची अपेक्षित वाढ झालेली नाही. काही भागात पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय.