सातारा : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ३४१४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानपोटी तीन कोटी ९३ लाख सात हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी सातारा जिल्ह्यात दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ३४१४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये २८५४ अर्ज पात्र, तर ४९० अर्ज अपात्र ठरले असून, ७१ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे.
पात्र अर्जापैकी २४३३ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.
२१९१ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ९१२ शेततळ्यांचे काम सुरू असून, ८७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. ८७२ शेततळ्यांना अनुदान म्हणून तीन कोटी ९३ लाख सात हजार रुपये वितरित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यातून या योजनेस प्रतिसाद वाढू लागला आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत दीड हजारावर शेततळी पूर्ण होणार आहेत. या शेततळ्यामध्ये शाश्वत पाणीसाठा होणार असल्याने टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.
तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे ः सातारा ५२, कोरेगाव १२३, खटाव १२४, माण १८५, फलटण २२४, वाई ५४, खंडाळा ६८, महाबळेश्वर १, जावली ४, कऱ्हाड ३९.