नगर ः यंदाच्या खरीप हंगामासाठी नगर जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन दोन लाख १ हजार ४३० मेट्रीक टन खतांची मागणी केली आहे, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली. मागील तीन वर्षांतील मागणी आणि मंजूर आवंटन याचा विचार करून ही मागणी केली असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वसाधारण चार लाख ७८ हजार ६३८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. त्यामुळे कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी ५ लाख २१ हजार १९५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्याच अनुषंगाने कृषी विभागाने ७५ हजार ९६० टन युरिया, १८,९८० टन डीएपी, ९७७० मेट्रीक टन एमओपी, २६ हजार ५४० मेट्रीक टन एसएसपी आणि ७० हजार १८० टन एपीके खतांची मागणी केली आहे.
गतवर्षी खरिपात (२०१७-१८) २ लाख ९३ हजार २४४, रब्बीत २ लाख ९ हजार ३७ टन, २०१६-१७ मध्ये रब्बी हंगामात १ लाख ५९ हजार २५७ टन तर खरिपात १ लाख ७२ हजार ३२२ टन खतांचा पुरवठा करण्यात आला होता. यंदा दोन लाख १ हजार ४३० टन खताची मागणी नोंदविण्यात आली असली, तरी त्यात क्षेत्र वाढ अथवा कमी झाल्यास बदल होऊ शकतो असे सांगण्यात आले.