सांगली : जिल्हा कृषी विभागाने आगामी खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आदी एक लाख २३ हजार २२१ टन रासायनिक खते आणि ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कडधान्याच्या ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची जिल्ह्याला गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन महाबीज आणि खासगी कंपन्यांकडे मागणी नोंदवण्यात आली आहे. मागणीनुसार
२६ हजार टन खत जिल्ह्यात उपलब्ध झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात खरिपातील विविध पिकांचे पेरणी क्षेत्र सुमारे दोन लाख ९५ हजार हेक्टरपर्यंत आहे. या क्षेत्राला लागणारे बियाणे आणि खते मॉन्सूनपूर्वी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे.
यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे कृषी विभागाने हा अंदाज ग्राह्य धरून खते आणि बियाणांची मागणी संबंधित यंत्रणांकडे नोंदवली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यात कडधान्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
मात्र, यंदाच्या खरीप हंगामात कडधान्ये बियाणांची मागणी कमी केल्याचे कृषी विभागाच्या अहवालात दिसते आहे. कडधान्यांच्या बियाणे मागणीत वाढ करणे गरजेचे आहे. तसेच सूर्यफूलाचे देखील बियाणे कमी मागणी केली आहे. मात्र, कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.