शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची जबाबदारी मोठी : राज्यमंत्री पाटील

शिवारफेरीचे उदघाटन
शिवारफेरीचे उदघाटन

अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी स्थित्यंतरे झाली अाहेत. अाज कमी पाण्यात अधिक उत्पादन कसे मिळू शकेल, असे तंत्र शेतकऱ्यांना हवे अाहे. यामुळे प्रगत शेतीसाठी, शेतीतील काळानुरूप सुधारणांसाठी कृषी विद्यापिठांची जबाबदारी मोठी आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापनादिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीचे शनिवारी (ता. २०) उदघाटन झाले. या वेळी डॉ. पाटील बोलत होते. विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षास शनिवारी प्रारंभ झाला असून त्यानिमित्त उदघाटन सोहळ्याचे अायोजन करण्यात अाले होते. या वेळी महाराष्ट्र शिक्षण कृषी व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष संजय धोत्रे, अामदार रणधीर सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. मानकर या वेळी उपस्थित होते.

या वेळी डॉ. पाटील म्हणाले, की शेतकरी हासुद्धा एक संशोधक अाहे. त्याला हव्या असलेल्या असंख्य बाबी तो बनवित असतो. काळ बदलला तशा पीकपध्दती, तंत्रात बदल झाले. शेतकरी नवीन गोष्टींचा ध्यास घेत अाहेत. त्याला शासनही पाठबळ देत अाहे. कृषीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी यावर्षी बोंड अळी निर्मूलन कार्यात चांगला सहभाग घेतला. अशाच प्रकारे शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या प्रचारातही पुढाकार घेतला पाहिजे. शेततळी, अारोग्यविमा याबाबत जनजागृती चांगल्या पद्धतीने झाली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.        

खासदार धोत्रे म्हणाले, की देशाला अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यात, शेतकऱ्यांना नवनवीन वाण, तंत्र देण्यात कृषी विद्यापिठांचे योगदान खूप मोठे अाहे. अाजच्या शेतीपुढे हवामान बदलाचे मोठे अाव्हान अाहे. गेल्या हंगामात बोंड अळीमुळे नुकसान झाले. या वेळी विद्यापीठ, कृषी विभाग, शेतकऱ्यांनी एकत्र येत हे अाव्हान परतवून लावले. एकत्र येत काम करण्याचे हे फलीत अाहे. गुजरात सरकारला बोंड अळीवर नियंत्रणासाठी तीनवर्षे लागली. हेच काम अापण वर्षभरात पूर्ण केले. यात विद्यापीठाची मोठी भूमिका होती. काळ बदलला तशा पीकपद्धती बदललल्या. अापल्या संशोधनाबाबत विचार व्हायला हवा. अापण करीत असलेल्या संशोधनाचा समाजाला किती उपयोग होतो हे महत्त्वाचे अाहे. प्रयोगशाळांमध्ये कितीही चांगले संशोधन होत असले तरी ते प्रत्यक्षात बाहेर यायला हवे. पिकांच्या दृष्टीने अापले प्राधान्यक्रम, धोरणे काय असावीत याचाही विचार केला गेला पाहिजे.

डॉ. व्ही. एम. भाले यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाने गेल्या ५० वर्षांत केलेल्या संशोधन, पीकवाणांचा अाढावा घेतला. डॉ. प्रदीप बोरकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डी. एम. मानकर यांनी अाभार मानले. शिवारफेरीसाठी पहिले शेतकरी दांपत्य म्हणून नोंदणी झालेले वर्धा जिल्ह्यातील दिलीप पोहणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात अाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com