औरंगाबाद : मराठवाड्यातील जनावरांसाठी आवश्यकतेच्या तुलनेत चारा उपलब्धता स्थिती नुकतीच स्पष्ट झाली आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यात जनावरांच्या तुलनेत सर्वांत कमी ८२ दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत जास्त ३५३ दिवस पुरेल एवढा चारा जनावरांसाठी शिल्लक असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील जनावरे संख्येच्या तुलनेत साधारणत: सरसकट २०० दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे.
पशुगणनेनुसार मराठवाड्यात ५१ लाख ३७ हजार जनावरे आहे. त्यामध्ये १३ लाख ६० हजार लहान, तर ३७ लाख ७७ हजार मोठ्या जनावरांचा समावेश आहे. उपलब्ध असलेल्या जनावरांनुसार दरदिवशी २६ हजार ७४२ टन तर महिन्याला ८ लाख २ हजार टन चाऱ्याची गरज भासते.
प्रशासकीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मराठवाड्यात ५३ लाख ५३ हजार टन चारा शिल्लक आहे. जिल्ह्यानिहाय उपलब्धतेनुसार औरंगाबाद जिल्ह्यात १३ लाख ७ हजार, जालना जिल्ह्यात २ लाख ७४ हजार , बीड जिल्ह्यात ५ लाख ५३ हजार, लातूर जिल्ह्यात ८ लाख ९२ हजार, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ लाख २६ हजार, नांदेड जिल्ह्यात ९ लाख ३७ हजार, परभणी जिल्ह्यात ३ लाख ३५ हजार तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख २९ हजार मेट्रीक टन चारा शिल्लक आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पशुधनाच्या तुलनेत शिल्लक असलेला चारा किमान ३५३ दिवस पुरेल एवढा आहे. जालना जिल्ह्यात ८२ दिवस पुरेल एवढा चारा आहे. बीडमध्ये १३० दिवस, लातूरमध्ये २६८ दिवस, उस्मानाबादमध्ये २९४ दिवस, नांदेडमध्ये २०८ दिवस, परभणीमध्ये ११४ दिवस तर हिंगोली जिल्ह्यात १२२ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे.
नुकत्याच पार पडलेल्या खरीप आढावा बैठकीत पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या उपलब्धतेविषयी सविस्तर आकडेवारी सादर करण्यात आली.