नगर : गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा उन्हाळ्यातही चारा पिके घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत जिल्हाभरात सव्वातीन हजार हेक्टर क्षेत्रावर चारा पिकांची पेरणी झाली आहे. चारा पीक लागवड क्षेत्रात अजूनही वाढ होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र मागील पाच-सहा वर्षांपासूनच सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने व चारा, पाणी उपलब्ध होत नसल्याने दूध व्यवसायावर परिणाम झाला होता. गेल्यावर्षी आणि यंदा मात्र चांगला पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले परिणामी परिस्थिती बदलत आहे. सध्या जिल्हाभरात जवळपास गाय व म्हैसवर्गीय सोळा लाखांच्या जवळपास जनावरे आहेत. शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी चारा पिके घेण्यावरही भर देत आहेत.
आतापर्यंत जिल्हाभरात चाऱ्यासाठी ११७६ हेक्टरवर उन्हाळी मका, ३४७ हेक्टवर कडवळ, एक हजार ६४ हेक्टरवर लसूणघास, १२७ हेक्टरवर नेपीयर ग्रास आणि ५७७ हेक्टर क्षेत्रावर अन्य चारा पिकांची लागवड करण्यात आली आहे.