आष्टी, जि. बीड : कर्जमाफी फसवी आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. सरकारला शेतकरी उद्ध्वस्त करायचा आहे. सरकारने शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी; अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल, असे मत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांची वीज तोडायचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा श्री. पवार यांनी दिली.
आष्टी (जि. बीड) येथे सोमवारी (ता. १३) अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा झाला. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, जयसिंग सोळंके, मतदारसंघाचे नेते बाळासाहेब आजबे, आमदार सतीश चव्हाण, युवक नेते संदीप क्षीरसागर, माजी आमदार राजेंद्र जगताप, उषा दराडे, राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, माजी सभापती महेंद्र गर्जे, महेबूब शेख, ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर, चंपावतीबाई पानसंबळ, विश्वास नागरगोजे अादी उपस्थित होते.
या वेळी भाजप नेते आणि जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक ः मुंडे
धनंजय मुंडे म्हणाले, की सरकारला शेतकरी उद्ध्वस्त करायचा आहे. सोयाबीन, मूग व इतर पिकांकडे दुर्लक्ष करण्यात अाले अाहे. कर्जमाफीत फसवणूक केली. कर्जमाफी योजनेवर टीका होऊ नये म्हणून छत्रपतींचे नाव दिले आहे. लाभार्थी जाहिरातीही फसव्या आहेत. लाभार्थी जुन्या काळातील आहेत, असा अारोप त्यांनी केला.