माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार कोटींचा भुर्दंड : पवार

नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते मुंबई, अशी रेल्वेसेवा विकसित झाली असती, तर त्याचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला फायदा झाला असता. देशाचेच हित पाहताना हीच बुलेट-ट्रेन मुंबई-अहमदाबाद-दिल्ली, अशी व्हायला हवी होती. मात्र, त्यात फक्त गुजरात राज्याचे हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतला गेला. त्यातही याच कामासाठी महाराष्ट्र सरकारला २५ हजार कोटींचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने हा निर्णय राज्याला अर्थिक संकटात टाकणारा अाहे, अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.

नगरमध्ये पत्रकरांशी बोलताना श्री. पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘मुंबई-अहमदाबाद मार्गावर अकरा रेल्वे स्टेशन आहेत. त्यातही फक्त चार स्टेशन महाराष्ट्रात असून, हे अंतर एका तासांत कापले जाणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा राज्याला अगदीच नगण्य आहे.’’

देशातील सामान्य जनता पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीने त्रस्त आहे. त्यातही इंधनात दरवाढ करावी, अशी कोणतीही स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात नाही. त्यामुळे सामान्यांच्या हितासाठी सरकारने ही दरवाढ तत्काळ मागे घेण्याची गरज आहे. याच मुद्द्यावर आता शिवसेना रस्त्यावर उतरल्याने त्यांच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. तथापि, त्यांनी सरकारमध्ये राहून करण्याऐवजी बाहेर पडून संघर्ष करावा, अशी भूमिका श्री. पवार यांनी मांडली.

संपूर्ण कर्जमाफी ‘लबाडा’चे आमंत्रण ठरले

मुख्यमंत्र्यांनी पहिल्या भाषणात संपूर्ण कर्जमाफीचे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादीचे त्याचे स्वागत केले होते. त्यानंतर कर्जमाफीबाबत ओळीचे सहा अध्यादेश काढले. त्यातही अगोदर दीड लाखापर्यंत कर्जमाफी होईल, असे सांगितले. नंतर शेतकऱ्यांनी आधी पैसे भरावेत, असे आदेश दिले. मुळात अल्पभूधारक किंवा जिरायत शेतकरीही अर्थिक संकटात आहेत. ते पैसे भरू शकत नाहीत. त्यात कर्जमाफीच अर्जही खूपच किचकट केले आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी लबाडाघरचे निमंत्रण ठरल्याची टीका श्री. पवार यांनी केली.

‘नव्या पिढीसाठी रयतला दातृत्व दाखवा’

कर्मवीर भाऊराव पाटलांनी ग्रामीण भागातील गोरगरीब, कष्टकरी, मजूर, सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेत हजारो विद्यार्थी घडले आणि घडत आहेत. ग्रामीण भागातील लोकांनी केलेल्या दातृत्वामुळेच हे शक्‍य झालेले आहे. मात्र अलीकडच्या मदत करणाऱ्यांचे हात कमी पडत आहेत. भविष्याच्या नव्या पिढीसाठी रयतला दातृत्व दाखवावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले. नगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे श्री. पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com