गडचिरोली ः सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. त्याच्या परिणामी राज्यात शेतकरी, व्यापारी आणि सर्वच घटकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, या अस्वस्थतेचे परिणाम २०१९ च्या निवडणुकांमध्ये पाहावयास मिळतील, त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शरद पवार हे चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्याची सुरवात पूर्व विदर्भातील गडचिरोलीपासून बुधवारी (ता. १५) झाली. येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी पक्षाचे रमेश बंग, अनिल देशमुख, धर्मरावबाबा आत्राम अादी उपस्थित होते.
श्री. पवार यांनी आपल्या भाषणात सरकारच्या फसव्या कर्जमाफीचा चांगलाच समाचार घेतला. शेतकरी कर्जमाफीची आस लावून आहेत. परंतु कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी दर दिवशी नवी तारीख जाहीर केली जाते. आता मुख्यमंत्र्यांनी २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी होईल, असे जाहीर केले. परंतु एकंदरीत बेभरवशाची ऑनलाइन यंत्रणा पाहता हे शक्य वाटत नाही, असे त्यांनी नमूद केले.